प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास दर महिन्याला 200 युनिट वापरणाऱया गोव्यातील लोकांना वीज मोफत देऊ, अशी घोषणा आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार राघव चड्डा यांनी केली आहे. गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे आव्हान आपण स्वीकारले होते, पण ते चर्चेसाठी न येता मैदान सोडून पळाले, अशी टीकाही चड्डा यांनी केली.
आपच्या पणजीतील कार्यालयात काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राघव चड्डा बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सीसीला रॉड्रिग्स, सुरेल तिळवे, संदेश तेलेकर व इतर उपस्थित होते.
नीलेश काब्राल मैदान सोडून पळाले
वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी राज्यातील विजेच्या विषयावर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते, त्याला उत्तर देण्यासाठी आपण खास गोव्यात आलो आहे. गोव्यात आल्यापासून काब्राल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी सपर्क होत नाही. याचाच अर्थ काब्राल मैदान सोडून पळाले आहेत्। अशी टीका चड्डा यांनी केली.
भाजप वीज मॉडेलमधून जनतेची लूट
गोव्यात आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास दर महिन्याला 200 युनिट वापरणाऱया गोव्यातील लोकांना वीज मोफत देणार. 200 ते 400 पर्यंत दर महिन्याला युनिटचा वापर करतील त्यांना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. गोव्यात 73 टक्के लोक 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात तर 20 टक्के लोक 200 ते 400 युनिट विजेचा वापर करीत आहेत. आप सत्तेत आल्यास केजरीवाल वीज मॉडेलचा सगळ्याच लोकांना मोठा फायदा होणार आहे. एका बाजूने भाजपा स्वतःच्या वीज मॉडेलमधून जनतेची लूट करीत आहे तर दुसऱया बाजूने केजरीवाल वीज मॉडेल जनतेचे भले करीत आहे. गोव्यातील जनतेला काय हवे ते त्यांनीच ठरवावे, असेही चड्डा म्हणाले.
विधानसभा लढत आप विरुध्द भाजप
पुढे बोलताना चड्डा म्हणाले की काब्राल यांनी भावनेच्या भरात आव्हान दिले खरे मात्र नंतर त्यांच्याच पक्षातील हायकमांडकडून काब्राल यांना चांगलीच चंपी पडली असल्याने त्यांनी अनेक निमित्ते पुढे करून चर्चा करण्याचे टाळले आहे. दिल्लीत आपचे तीन वेळा सरकार आले असून दिल्लीतील अधिकाधिक लोक वीज मोफत वापरत आहेत. गोव्यातील लोकांवर मोठय़ा प्रमाणात वीज बिले लादून जनतेला लुटले जात आहे. गोव्यात केवळ फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. आमदार फोडण्यासाठी ज्या पैशांचा वापर केला जात आहे ते पेसे या ना त्या निमित्ताने जनतेकडूनच उकळले जाते अशी टीकाही चड्डा यांनी केली.
भाजपाबरोबरच राज्यातील काँग्रेसही भ्रष्ट असल्याने येणाऱया विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना नक्कीच नाकारेल यात शंकाच नाही. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला 17 आमदार जनतेने दिले होते. भ्रष्ट मनोवृत्तीचे काँग्रेसचे आमदार नंतर जाऊन भाजपलाच मिळाले असल्याने जनता त्यांच्यावर नाराज आहे. आता येणाऱया निवडणुकीत भाजपा विरोधात आप अशीच लढत होणार असून आपला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास चड्डा यांनी व्यक्त केला आहे.
जनतेचा पैसा जनतेसाठी वापरणार
दिल्लीचे बजेट एकूण 60 हजार कोटीचे असून लोकसंख्या सुमारे 2 कोटी आहे. त्यामुळे दर डोई सरकारला 30 हजार रुपये खर्च करता येतात आणि केजरीवाल सरकार ते करीत आहे. वीज आरोग्य सेवा, तसेच शिक्षण मोफत दिले जात आहे. या उलट गोव्यात भाजपा सरकार जनतेला खुले आम लुटत आहे. गोव्याचे एकूण बजेट 21 हजार कोटी आहे तर लोकसंख्या केवळ 15 लाख आहे. प्रत्येक व्यक्तीला सुमारे 1 कोटी 40 सहजपणे खर्च करता येणे शक्य आहे. मात्र तसे होते काय असा प्रश्न चड्डा यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी वापरला पाहिजे.
गोव्यात बिजबिले भरमसाठ दिली जातात, मात्र दर दिवशी विजेच्या समस्यांना लोकांना सामोरे जावे लागते. आरोग्य सेवेचीही बोंबाबोंब आहे. सरकारी इस्पितळात तपासणी केली जाते, मात्र हजारो रुपयांची औषधे बाहेरून आणावी लागतात. शिक्षणाच्याबाबतीतही तीच कथा असून केवळ प्रवेश मिळविण्यासाठीच लाखो रुपये खर्च करावे लागतात असेही चड्डा म्हणाले. आप सत्तेत आल्यास जनतेचा पैसा जनतेसाठी हेच धोरण राबवू असे चड्डा शेवटी म्हणाले.