बेळगाव शेतकरी संघटनेचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
मान्सूनच्या जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱयांच्या जमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भगदाड पडली आहे. शेतामधील माती मोठय़ा प्रमाणात वाहून गेली. त्यामुळे भातपिकांचे तर नुकसान झालेच, शिवाय जमिनींचेही नुकसान झाले. त्या शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेने कागदपत्रांची जमवाजमव केली होती. ती कागदपत्रे सोमवारी शहापूर येथील कृषी अधिकारी आर. बी. नायकर व वज्रश्वरी कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली.
जून महिन्यामध्ये झालेल्या जोरदार वृष्टीमुळे 200 मि.मी.पेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जमिनीतील बांध तसेच माती वाहून गेली. त्यामुळे मोठी भगदाडे पडली आहेत. शेतकऱयांना आता पीक घेणे तर अवघड झालेच आहे. मात्र, भगदाडे बुजविण्यासाठी आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके, बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी शिवाराची पाहणी करून कागदपत्रे जमा केली होती. ती कागदपत्रे सोमवारी कृषी अधिकाऱयांकडे दिली आहेत. यावेळी सुनील खन्नुरकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.