- फडणवीसांकडूनही ‘लावा रे तो व्हिडिओ’
ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :
परतीच्या पावसाने मराठवाडा, महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा 76 % जास्त पाऊस झाला. या पावसामुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे संपवावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकाळ मदतीसाठी वेळ लागेल, पण तत्काळ मदत करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, 8 दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेले नाही. अनेक ठिकाणी जमिनी, माती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष योजना तयार करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा नाही
फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर 25 हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळालेला दिसत नाही अशी टीका करताना इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, घोषणा करुन समाधान होणार नाही. इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकते, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
- राज्य सरकार काय मदत करणार ते सांगा
केंद्राच्या मदतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्राला नक्कीच मदत करेल. केंद्राच्या आधी राज्य काय मदत करेल ते आधी सांगावे तसेच केंद्राची मदत कधी मिळते हे शरद पवारांना माहिती आहे, असे असूनही जाणूनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. सरकारचा नाकर्तेपणा जपण्याची जबाबदारी सध्या पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करीत आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहेत.
एक लाख वीस हजार कोटींचे राज्याला कर्ज काढता येते. आतापर्यंत महाराष्ट्राने केवळ साठ हजार कोटींचे कर्ज काढले आहे. आणखी साठ हजार कोटी कर्ज राज्याला काढता येऊ शकते. जीएसटी परतावा म्हणून राज्याकडे पैसा येणार आहे त्यामुळे राज्याने मदत जाहीर करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.