‘रासप’ ची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
प्रतिनिधी / कोल्हापूर
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, यासह विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात शेतकऱ्यांना मदतीसंदर्भातील फलक झळकत होते.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात पिक पंचनामे सुरु करण्यात आल्याचे गलांडे यांनी सांगितले. नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा’, तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, आदी मागण्या करत लवकर अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
या आंदोलनात अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सलीम पटवेगार, शहराध्यक्ष दशरथ भोसले, चंद्रकांत खोंद्रे, प्रितम बंदसोडे, उमाजी सनदे आदी सहभागी झाले होते.