सातारा / प्रतिनिधी :
अतिवृष्टी, महापूर यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कृषी विभागातर्फे या भागाचे पंचनामे सुरू आहेत. पण अतिवृष्टी, पडझड आणि खचलेले रस्ते यामुळे सरकारी यंत्रणा अडकून पडल्याने पंचनाम्यास अडथळे येत आहेत. पण शेतकी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण योजने अंतर्गत निधी मिळणार आहे. याचा दरही निश्चित करण्यात आला आहे. पंचनामे पुर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
शासनाने भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व कांदा या 9 पिकांना विमा संरक्षण दिले आहे. या पिकांचा 70 टक्के जोखीमस्त ठरवण्यात आला असून पिक क्षेत्राचे किती टक्के नुकसान झाले त्यावर प्रति हेक्टरी नुकसान भरपाई ठरवली जाते. यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासन स्वहिस्सा भरते. तसेच शेतकऱयांकडूनही प्रति हेक्टरी पैसे भरून घेतले जातात.
यामध्ये भातासाठी 33 हजार, ज्वारी 16 हजार, बाजरी 14 हजार, नाचणी 16 हजार, भुईमूग 31 हजार 500, सोयाबीन 26 हजार, मूग 20 हजार, उडीद 20 हजार, कांदा 36 हजार इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. सदर मदत मिळविण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक होते. सध्या या योजनेची मुदत दि. 23 रोजी संपली असुन, या योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱयांना मात्र याचा फटका बसणार आहे. काही शेतकऱ्यांनी पोर्टलद्वारे तर काहींनी बँके अंतर्गत या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्ज केला होता. सरकारी पोर्टल अंतर्गत 4 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला असून, बँकांमार्फत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.