जिल्हा प्रभारी सचिव एल. के. अतिक यांची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
पुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या. नुकसान घेऊनही ज्यांनी घरे बांधली नाहीत त्यांना नोटिसा बजावा. मात्र कोणतेही काम प्रलंबित न ठेवता कामे पूर्ण करा, अशी सक्त ताकीद ग्राम विकास आणि पंचायतराज विभागाचे प्रधान कार्यदर्शी आणि जिल्हा प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी केली आहे.
पुरासंदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच अधिकाऱयांना सूचना करण्यासाठी अतिक यांनी जिल्हा पंचायतच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱयांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली आहे. पुरामुळे ज्यांची घरे पडली आहेत त्यांना वेळेवर रक्कम द्या, रक्कम देऊनदेखील जर कोणीही घरे बांधत नसतील तर त्यांना नोटीस बजावा. त्यानंतर पुढील कारवाई करा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता मोठय़ा अडचणीत सापडली आहे. त्यातच पाऊस झाल्यामुळे आणखीनच अडचण वाढली आहे. ग्रामीण भागातील पेयजल प्रकल्प योजना प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्याची सूचनादेखील यावेळी केली आहे. घरोघरी पाणी पुरवठा करण्याबाबत ही योजना राबविली जाते. ती योजना वेळ न घालता तातडीने राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून जिह्यातील कोरोनाचा आढावा तसेच वैद्यकीय सेवेबाबत माहिती घेतली. आता आरोग्य विभागाने तातडीने रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे प्रसूती विभागातील समस्या दूर करून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सर्व सुविधा पुरवाव्यात, असे त्यांनी सांगितले. पुरामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. याचबरोबर शाळा, अंगणवाडी इमारतींची पडझड झाली आहे. त्यांचा सर्व्हे करून त्यांचीही दुरुस्ती करा, असेही त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.
खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. तेव्हा शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी बी-बियाणे व खते उपलब्ध करावीत, असे एल. के. अतिक यांनी अधिकाऱयांना सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त के. एच. जगदीश व इतर अधिकारी उपस्थित होते.