शिवाजीनगर येथील रहिवासी नुकसानभरपाईपासून वंचित : महापालिका-तहसीलदार कार्यालयाच्या बेजबाबदारपणा
प्रतिनिधी / बेळगाव
दोन वर्षांमागील झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवाजीनगर येथील रहिवासी प्रभाकर कडेमनी यांच्या घराचे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी महापालिकेकडे व तहसीलदार कार्यालयात अर्ज केला असता नुकसानभरपाई देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या वळीव पावसात संपूर्ण घर कोसळले पण नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही.
महापालिका व तहसीलदार कार्यालयाच्या बेजबाबदारपणामुळे साहाय्य धनापासून वंचित रहावे लागले. आता तरी नुकसान भरपाई मिळणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. दोन वर्षांमागील झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घरांचे नुकसान झाले होते. त्यादरम्यान प्रभाकर कडेमनी यांच्या घराची भिंती कोसळून छताचे तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी तहसीलदार कार्यालयात घर पडल्याची माहिती नोंदविली होती. याची दखल घेऊन महापालिकेच्या कर्मचाऱयांनी पाहणी करून पंचनामा केला होता.
तसेच कडेमनी यांना 17 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र पाठविण्यात आले होते. तसेच साहाय्यधन देण्यासाठी तहसीलदार व महापालिका कार्यालयात पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप जिल्हाधिकाऱयांच्या पत्राची दखल महापालिका व तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱयांनी घेतली नाही. अद्यापही साहाय्य धन मिळाले नसल्याने मोडकळीस आलेल्या घरातच कडेमनी रहात होते. मात्र उरलेले घरदेखील शुक्रवारी झालेल्या वळीव पावसामुळे कोसळले आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी सरकारकडून नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर शासनाने तातडीने नुकसानभरपाई देऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.