तरूण भारत संवाद प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील किती शेतकरी व त्यांची एकूण किती जमीन विमा संरक्षणाखाली येते त्याची माहिती तयार करावी. शासनाकडून अतिवृष्टीने जेवढे नुकसान झाले आहे. तेवढी मदत नक्कीच केली जाणार आहे. तरी प्रशासनाने सरसकट सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्वरीत अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात (दि.18) आयोजित अतिवृष्टी झालेल्या तिथेच नुकसानीच्या आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार बोलत होते. यावेळी उमरगा विधानसभा चे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अध्यक्ष राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सहा लाख 2 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. त्यापैकी 1 लाख 36 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर इत्यादी पिके अतिवृष्टीने बाधित झाल्याचे दिसून येत आहे. तरी प्रशासनाने जिल्ह्यातील किती खातेदारांनी पिक विमा भरलेला आहे याची खात्री करावी. तसेच झालेल्या पिकाचे नुकसान सरसकट करून नजर अंदाज पाहणी करावी. तसेच पिक विमा कंपनीने त्वरित पंचनामे पूर्ण करून पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व पुरामुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना सन 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत मिळवून देण्याबाबतची कार्यवाही करावी. त्याप्रमाणेच रस्ते व पुलांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्याबाबत सर्वेक्षण पूर्ण करावे व जिल्ह्यातील पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व इतर बॅरेजेसचे किती नुकसान झाले आहे व त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीच्या तरतुदीबाबत वेगळा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले.
कृषी विभागाने पंचनामे त्वरित करण्याबरोबरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक तेवढे बियाण्यांची उपलब्धता करून ठेवावी. जिल्ह्यात जवळपास चार लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने कृषी विभागाची तयारी असली पाहिजे असे निर्देश श्री वडेट्टीवार यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने जोपर्यंत संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती होत नाही. तोपर्यंत त्यांना टोल वसुली करू देऊ नये. याबाबत निर्णय घ्यावा. असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 12 ते 15 ऑक्टो्बर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची माहिती दिली. तसेच या कालावधीत प्रशासनाने 128 लोकांचे जीव वाचवल्याचे सांगून अतिवृष्टी व पुरामुळे 114 जनावरे दगावली तर 136 घरांची पडझड झाल्याची माहिती दिली. अतिवृष्टी नंतर तात्काळ पंचनामे करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगून त्या अनुषंगाने कार्यवाही गतीने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात एकूण सहा लाख 74 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून त्यापैकी सहा लाख 2 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेले असून त्यातील तीन लाख 74 हजार हेक्टर क्षेत्र हे सोयाबीन या पिकाखाली आहे. अतिवृष्टीने एक लाख 36 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिली. 42 महसुली मंडळ पैकी 15 महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील एकूण 223 प्रकल्पापैकी 140 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, असे त्यांनी सांगून लहान मध्यम व मोठ्या प्रकल्पांचे ऑडिट करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शासनाच्या वतीने जशी मदत देण्यात आली त्याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यात ही शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी केली. नारंगवाडी येथील नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी नारंगवाडी तालुका उमरगा येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.