आठ दिवसांत भात पंचनामे पूर्ण करा – पालकमंत्र्यांचे आदेश
कामात हलगर्जीपणा करणाऱया खारेपाटण तलाठय़ावर कारवाई
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
अतिवृष्टीमुळे झालेल्या भातपीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीची पाहणी करायला सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणार आहेत. तर पंचनाम्याच्या कामात हयगय करणाऱया खारेपाटण तलाठय़ावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱयांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातपीक नुकसानीची पाहणी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक व अन्य अधिकाऱयांनी सोमवारी केली. त्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, संदेश पारकर, विकास कुडाळकर, जान्हवी सावंत उपस्थित होते.
खारेपाटण तलाठय़ावर कारवाई सुरू!
पालकमंत्री म्हणाले, आपण जिल्हय़ात दहा ठिकाणी जाऊन भातपीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांनी आपल्या कामात कोणतीही हयगय न करता युद्धपातळीवर आठ दिवसात पंचनामे पूर्ण करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे तातडीने करायचे आहेत. जे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. खारेपाटण तलाठी गावातच जात नाही, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांचा चार्ज काढून घेऊन कारवाई सुरू केली आहे.
मागील भरपाई देण्यास आदेश
भातपीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हय़ात येणार आहेत. नुकसानीचे पंचनामे करताना शेतकरी सांगतील, त्या पद्धतीने पंचनामे करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. नुकसानीची पाहणी करत असताना गेल्या वषी झालेल्या नुकसानीची भरपाई काही शेतकऱयांना मिळाली नाही, अशा तक्रारी लोकांनी मांडल्या. त्यामुळे दोन दिवसांत मागील भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हय़ात नवीन 11 महसूल मंडळांची स्थापना केली आहे. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्रे वाढणार आहेत व पर्जन्यमान मोजणी योग्यप्रकारे केली जाणार आहे. याचा फायदा हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आंबा व काजू बागायदार शेतकऱयांना होणार आहे, असेही ते म्हणाले.