आसाम सरकारने घेतला निर्णय : काँग्रेसकडून टीका
वृत्तसंस्था /गुवाहाटी
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील राजीव गांधी ओरंग नॅशनल पार्कच्या नावात बदल होणार आहे. राज्य सरकारने आदिवासींच्या मागण्यांचा दाखला देत नॅशनल पार्कच्या नावातून राजीव गांधींचे नाव हटविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्कला आता अधिकृत स्वरुपात ओरंग नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाणार आहे.
आसाममधील काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी या निर्णयाला अपमानास्पद ठरविले आहे. देशभरात असे प्रकार घडल्याचे आम्ही पाहिले आहे. जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, राजीव गांधींपर्यंत काँग्रेसशी संबंधित राहिलेल्या पंतप्रधानांचा हा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी या नेत्यांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रकार चालविला आहे. या सर्व माजी पंतप्रधानांनी देशासाठी प्राणांचे बलिदान केल्याचे मोदींनी विसरू नये, असे गोगोई म्हणाले.
आसामच्या दरांग आणि सोनितपूर जिल्हय़ांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर काठावर असलेले राजीव गांधी ओरंग नॅशनल पार्क 78.80 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये फैलावलेले आहे. 13 एप्रिल 1999 रोजी याला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले होते. दलदल, नद्या आणि गवताळ मैदानांमुळे ओरंगला मिनी काझीरंगा म्हणूनही ओळखले जाते. काझीरंगाप्रमाणेच येथेही एक शिंग असलेल्या गेंडय़ांचे वास्तव्य आहे. मागील प्राणीगणनेनुसार पार्कमध्ये सुमारे 24 रॉयल बंगाल टायगर्स आणि 100 हून अधिक गेंडे राहतात.
व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानासाठी सारखी नावे असतील. व्याघ्र प्रकल्पाचे नाव कायमच ओरंग राहिले आहे. आता आम्हाला फलक, लेटरहेड आणि राजीव गांधींचे नाव असलेल्या अन्य चिन्हांना बदलावे लागणार असल्याचे मंगलदोईचे वन अधिकारी प्रदीप बरुआ यांचे म्हणणे आहे.
ओरंग नॅशनल पार्क राज्यातील सर्वात जुने अभयारण्य आहे. 1985 मध्ये याला वन्यजीव अभयारण्याचे नाव देण्यात आले होते. ऑगस्ट 2005 मध्ये तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने राजीव गांधी यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त दिवंगत पंतप्रधानांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानाला देण्याचा निर्णय घेतला होता.