प्रसिद्ध रंगकर्मी विजय केंकरे यांचे मत
प्रतिनिधी/ फोंडा
गोव्याच्या मातीतच कलेचे बिज आहे. नाटक व तियात्र या कलांमध्ये गोवा राज्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केले आहे. ही ओळख जपण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नाटक निवडताना आपल्या प्रादेशिक भाषेतीलच संहितांची निवड करा. तसेच येथील रंगभूमी विविधांगाने विकसित होण्यासाठी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शाखा गोव्यात सुरु होण्याची गरज प्रसिद्ध रंगकर्मी व निर्माते विजय केंकरे यांनी व्यक्त केली.
कला अकदमीच्या राज्यस्तरीय नाटय़ व तियात्र स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळय़ात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे, कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर, कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर व कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी या उपस्थित होत्या.
नाटक हे संप्रेषणाचे उत्तम माध्यम असल्याचे सांगून गोवा, महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या तीन राज्यांनी रंगभूमीच्या क्षेत्रात देशभरात विशेष योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्यातील नाटय़क्षेत्रात सृजनशिल व सर्जनशिल कलाकार आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेतही येथील नाटके आपली मोहोर उमटवितात. राष्ट्रीय स्तरावर नाटय़संहिता निवडताना कोकणी व मराठी भाषेतून निवडण्याची सूचना त्यांनी केली. तियात्राविषयी बोलताना रंगभूमिवरील हा जीवंत कलाप्रकार असल्याचे ते म्हणाले. एम. बॉयर सारख्या तियात्रिस्तला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे, हाच या कलेचा मोठेपणा आहे. गोव्यातील नाटक व तियात्र देशभर पोचले पाहिजे. त्यासाठी रंगभूमीवरील कलाकारांनी ही कला उत्तमपणे सादर करीत राहावा, असे ते म्हणाले.
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, कला माणसाचे जीवन घडवित असते. नाटकामुळे भाषा समृद्ध होते व तिचा विस्तारही होतो. नाटक व तियात्रामुळे येथील भाषा जगभर पोचली. याचे श्रेय रंगभूमीवरील कलाकारांना द्यावे लागेल. नाटक ही जीवंत कला असून समाजाचे ते प्रतिबिंब आहे. समाजप्रबोधनाचे ते प्रभावी माध्यम आहे.
यावेळी 54 वी ‘अ’गट नाटय़स्पर्धा, 47 वी ‘अ’ गट तियात्र स्पर्धा, ‘46’ वी कोकणी नाटय़स्पर्धा, 52 वी राज्यस्तरीय ‘ब’ गट मराठी नाटय़स्पर्धा तसेच राज्य कला प्रदर्शन व अन्य स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. विनेश आर्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन प्रेमानंद पोळे व संजीव झर्मेकर यांनी केले, तर प्रदीप गावकर यांनी आभार मानले.