वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला नेटमधील सरावाकरिता बीसीसीआयने चार गोलंदाज आयपीएल स्पर्धेनंतर तेथेच थांबवले होते. त्यांना मायदेशी परत बोलावून घेण्यात आले आहे. भारतात होणाऱया आगामी टी-20 मुस्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा, शहबाज अहमद, के. गौतम आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर हे भारतात दाखल झाले आहेत. स्पर्धा सुरू झाल्यानंतर संघासाठी सराव सत्रे अधिक राहणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय निवड समिती सदस्यांनी या चार फिरकी गोलंदाजांना मायदेशी परतण्यास सांगितले. आता हे गोलंदाज आपल्या राज्यांच्या संघातून मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत खेळतील. या स्पर्धेपूर्वी या गोलंदाजांना सरावाची गरज आहे. मात्र वेगवान गोलंदाज आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल आणि मेरीवाला यांना मात्र आणखी काही दिवस भारतीय संघाबरोबर राहण्यास सांगितले आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होत आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी भारतीय खेळाडूंच्या सराव सत्रामध्ये संघाला लाभलेले नवे मेंटर धोनीचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. दरम्यान या सराव सत्रामध्ये हार्दिक पांडय़ाने गोलंदाजी केली नाही. दरम्यान सरावासाठी पाठविण्यात आलेले भारताचे चार गोलंदाज मायदेशी दाखल झाले.
हार्दिक पंडय़ाची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याचे जाणवते. सरावाच्या पहिल्या सत्रामध्ये मेंटर धोनीचे त्याला मार्गदर्शन लाभले. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी तो झगडत असल्याचे जाणवते. या स्पर्धेपूर्वी खेळविण्यात आलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सरावाच्या सामन्यात पंडय़ाला फलंदाजी करताना अवघडल्यासारखे वाटत होते.
धोनीने कर्णधार कोहलीसह संघातील इतर अनुभवी फलंदाजांना महत्त्वाचे टीप्स दिल्या. शुक्रवारी सराव सत्रात धोनीने राघवेंद्र, नुवान आणि दयानंद या सरावातील थ्रो-डाऊन स्पेशालिस्टना मदत केली. कर्णधार कोहलीने दुपारच्या सत्रात सराव केला.