मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे दिल्ली दौऱयावरून कर्नाटकात परतल्यानंतर नेतृत्व बदलाच्या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे. 26 जुलै रोजी भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण होतात. त्याचदिवशी मुख्यमंत्री राजीनामा देणार, कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावर अन्य नेत्याची निवड होणार, अशी चर्चा आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्याचे काम कोणीच केलेले नाही.
येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री असणार, असे यापूर्वी ठासून सांगणाऱया भाजप हायकमांडने नेतृत्व बदलाच्या चर्चेला उत्तर न देता मौन पाळले आहे. स्वतः येडियुराप्पा यांनीही ही चर्चा खोटी आहे, आपणच मुख्यमंत्रिपदावर राहणार, असा खुलासा केला नाही. यावरून ऑगस्ट मध्यापर्यंत कर्नाटकात नेतृत्व बदल होणार, असे भाकित आहे. भाजपने येडियुराप्पा यांना बाजूला सारू नये. जर असा निर्णय झालाच तर येडियुराप्पा यांच्यापेक्षा पक्षाचेच नुकसान अधिक आहे, अशी ओरड सुरू झाली आहे.
येडियुराप्पा यांच्या पाठीशी शेकडो मठाधीशांनी आपली ताकद उभी केली आहे. सिद्धगंगा मठाधीश, रंभापुरी जगद्गुरू, चित्रदुर्ग मुरुघामठाचे स्वामी यांच्यासह अनेक मठाधीशांनी सध्या नेतृत्व बदल करू नका. येडियुराप्पा यांना अपमानास्पद वागणूक मिळाली तर पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. मठाधीशांनी राजकारणात कितपत सहभाग घ्यावा, हा चर्चेचा भाग असला तरी सध्या केवळ वीरशैव लिंगायत मठाधीशच नव्हे तर पेजावर मठाधीश, मादार चन्नय्या गुरुपीठाचे मठाधीश यांच्यासह अनेक समाजाच्या मठाधीशांनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. कर्नाटकात सरकार उत्तमपणे काम करते आहे. सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन जाणाऱया मुख्यमंत्र्यांना कोणत्या कारणासाठी बदलत आहात? असा प्रश्न वेगवेगळय़ा मठाधीशांनी केला आहे. त्यामुळे मठाधीशांचा आक्रमकपणा हायकमांडसाठी अडचणीचा ठरणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेत पहिल्यांदा कर्नाटकात भाजप सत्तेवर आला. या प्रक्रियेत येडियुराप्पा यांचे योगदान मोठे आहे. याचा विसर पडू देऊ नका, असा इशारा मठाधीशांनी दिला आहे.
येडियुराप्पा यांच्या बेंगळूर व शिमोगा येथील निवासस्थानी रोज अनेक मठाधीश भेटी देत आहेत. त्यांना पाठिंबा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा निर्णयही काही मठाधीशांनी घेतला आहे. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकातील मठांना भरघोस देणग्या दिल्या. धार्मिकस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नेतृत्व बदल कशासाठी? असा प्रश्न मठाधीशांनी उपस्थित केला आहे. वेगवेगळय़ा गावात पत्रकार परिषदा घेऊन येडियुराप्पा यांना पाठिंबा जाहीर करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. केवळ मठाधीश त्यांच्या पाठीशी राहिले असते तर गोष्ट वेगळी होती. आता काँग्रेसचे ज्ये÷ नेते व माजी मंत्री शामनूर शिवशंकरप्पा व नव्या पिढीतील वीरशैव लिंगायत समाजाचे नेते एम. बी. पाटील यांनीही भाजपला इशारा दिला आहे. येडियुराप्पा यांना बदलले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या दोन काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. भाजपने या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. या घडामोडींवरून नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेत जात हा प्रमुख मुद्दा ठरतो आहे.
पुढील आठवडय़ात होणारी संसदीय पक्ष बैठक आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी तूर्त रद्द केला आहे. 26 जुलै रोजी निरोपाचे भाषण करून येडियुराप्पा राजीनामा देणार, अशी चर्चा होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, सी. टी. रवी, मुरगेश निराणी, अरविंद बेल्लद, गृहमंत्री बसवराज बोम्मई आदी नावांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष नळिनकुमार कटिल यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला. लवकरच नेतृत्व बदल होणार आहे, जगदीश शेट्टर, ईश्वरप्पा आदी नेत्यांना वगळण्यात येणार आहे. नवी टिम तयार करण्यात येणार आहे, असे प्रदेशाध्यक्षांनी या ऑडिओमध्ये बोलल्याचे दिसून येते. हा ऑडिओ आपला नाही, कोणीतरी आपल्याला व आपल्या पक्षाला बदनाम करण्यासाठी हा डाव केला आहे, म्हणून या ऑडिओ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांनी केली असली तरी या ऑडिओमुळे पक्षांतर्गत असंतोषामुळे जराजर्जर झालेल्या भाजपमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस-निजदमधून ‘ऑपरेशन कमळ’च्या गळाला लागलेल्या 17 नेत्यांचीही घालमेल वाढली आहे. स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी या नेत्यांची धडपड सुरू झाली आहे.
वीरेंद्र पाटील यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे कर्नाटकातील लिंगायत समाजाने काँग्रेसकडे पाठ फिरविली. या परिस्थितीचा फायदा घेत येडियुराप्पा यांनी राज्यात भाजप वाढविला. आता विविध कारणांमुळे त्यांना पायउतार व्हावे लागत आहे. आपल्या भेटीसाठी येणाऱया मठाधीशांसमोर हायकमांड जो निर्णय घेईल तो आपल्याला पाळावा लागणार, मुख्यमंत्रिपदावर रहा असे सांगितले तर राहू, राजीनामा देण्याची सूचना केल्यास तर राजीनामाही देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जर येडियुराप्पा यांना पायउतार व्हावे लागले तर काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार, याचे संकेत मिळू लागले आहेत. लिंगायत नेत्यावर प्रदेशाध्यक्षपद सोपवून आपल्यापासून दूर गेलेल्या लिंगायत समाजाला पुन्हा काँग्रेसकडे खेचण्याची खेळी काँग्रेस खेळणार आहे. याची सुरुवात म्हणूनच पक्षभेद विसरून काँग्रेसमधील लिंगायत नेत्यांनी येडियुराप्पा यांना अपमानास्पद वागणूक देऊ नका, असा इशारा भाजप नेत्यांना दिला आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाचा मुद्दा कळीचा बनला आहे. विरोध डावलून येडियुराप्पा बाजूला केले गेले तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा मठाधीशांनी दिला आहे. त्यामुळे ही परिस्थिती हायकमांड कशी हाताळणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी कोणी आंदोलन करू नका, पक्ष आपल्यासाठी मातेसमान आहे, असे ट्विट करून येडियुराप्पा यांनी नेतृत्व बदलासाठी आपल्यावर हायकमांडचा दबाव आहे, हे सूचित केले आहे. इतर राज्यात धडाधड नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात स्थिती नाजूक आहे. एक मोठा समाज दुखावला जाण्याची शक्मयता असल्याने दिल्ली हायकमांड ताकही फुंकून पित आहे.