कोविडच्या विळख्यात अडकू शकतात नेतेही : कार्यकर्त्यांचा गोतावळा टाळणे आवश्यक : कार्यकर्त्यांनीही नेत्यांना धोक्यात आणणे टाळावे
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
स्वत:च्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून आणि समूह संसर्ग टाळण्यासाठी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत मतदारसंघातील आपले दौरे, भेटी-गाठी कमी करणे वा कमालीची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. आमदार वैभव नाईक यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांत अक्षरश: घबराट पसरली आहे. पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, खासदार विनायक राऊत यांनी देखील खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. तसेच वेबिनार, झूम मिटिंगच्या माध्यमातून प्रशासनाकडून कामे करून घेतली पाहिजेत.
माजी पालकमंत्री ‘हायरिक्स’वर
आज माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार परशुराम उपरकर हे तब्येतीच्या दृष्टीने कोविडच्या पार्श्वभूमीवर हायरिक्सवर आहेत. कोविडच्या दृष्टिकोनातून अशा आजाराच्या व्यक्तींना कोरोनाची लागण अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरनी राणेंना सार्वजनिक कार्यक्रम सक्तीने टाळण्याचा सूचना केल्या आहेत. आमदार दीपक केसरकर, माजी आमदार परशुराम उपरकर यांना देखील डॉक्टरनी सार्वजनिक कार्यक्रम व सार्वजनिक स्थळांपासून जाणीवपूर्वक दूर राहाण्याच्या सूचना केल्या आहेत.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे यांना सुदैवाने कुठलेही आजार नसल्याचे समजते. माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार यांनाही काही आजार असल्याचे माहीत नाही. पण सदैव कार्यकर्त्यांच्या गराडय़ात वावरण्याची सवय या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडू शकते व पर्यायाने समूह संसर्गाला चालना मिळून जिल्हय़ाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
समूह संसर्गाची ‘टकटक’
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून हे संकट अधोरेखित झाले आहे. खरं तर यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा उठली होती. त्याचवेळी रत्नागिरीत पालकमंत्र्यांसोबत नियमित फिरणारे रत्नागिरीचे जिल्हा पोलीसप्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हा शल्यचिकित्सक पॉझिटिव्ह आले होते. सुदैवाने जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱयांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्याचवेळी समजून चुकले होते की कोरोनाचे हे संकट नेत्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातही कधीतरी पोहोचू शकते. पण या नेत्यांना सांगायचे कोणी? नेता म्हटला की कार्यकर्ते हे हवेच. बहुतांश कार्यकर्त्यांनाही विनाकारण नेत्यांच्या अवतीभोवती घुटमळण्याची सवय लागून गेलेली असते. पण त्यांना रोखायचे कोणी? सोबत येऊ नका म्हटलं की कार्यकर्ता नाराज होतो. सोबत घेतला तर संसर्गाची भीती. करायचे काय, अशा द्विधा मनस्थितीत नेता पडतो. त्यात नेत्याचा स्वभाव भिडस्त असला की मग त्याचे परिणाम आमदार वैभव नाईकांसारखे होतात.
जनसेवेच्या नादात अतिरिक्स आमदार नाईकांना भोवली
आमदार वैभव नाईक यांनी आतापर्यंत जनतेला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गावांना, आपद्ग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत. अनेक शासकीय कार्यालयांच्या भेटीगाठी, पत्रकार परिषदा, छोटे-मोठे कार्यक्रम इत्यादींनाही त्यांनी वेळोवेळी हजेरी लावली आहे. या भेटी दरम्यान कुठून तरी त्यांना कोरोनाची लागण झाली. घरीही त्यांचा मुक्काम तर होताच. कामानिमित्त व जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्याच्या निमित्ताने का होईना त्यांनाही कोरोनाची लागण झाली. याच दरम्यानच्या काळात असंख्य माणसे त्यांच्या संपर्कात आली. त्यामुळे त्यांच्या वा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा व्हायरस कुठेपर्यंत पोहोचला, हे येणाऱया काही दिवसात समजेलच. ते स्वत: पॉझिटिव्ह ठरल्याने त्यांचा जीव हा धोक्यात आलाच. पण आणखी अनेकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नाईक समर्थकांचे धाबे दणाणले नसतील, तर नवलच.
कणकवलीतील नेत्यांनी भान ठेवणे आवश्यक
पालकमंत्री उदय सामंत हे देखील ज्यावेळी सिंधुदुर्गच्या दौऱयावर येतात, तेव्हा त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा गोतावळा असतोच. पालकमंत्री सामंत, आमदार राणे यांच्या उपस्थितीतील गेल्या तीन महिन्यांतील विविध कार्यक्रमांची छायाचित्रे पाहिल्यास आढळून येईल. विनायक राऊतांच्या बाबतीतही तेच आहे. कणकवलीचे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाला अशाच प्रकारे असंख्य कार्यकर्ते व नेत्यांनी गर्दी केली होती. कणकवलीतील महामार्ग पुलाचा भाग कोसळला, त्यावेळी देखील नेते कार्यकर्त्यांच्या गराडय़ात दिसत होते. ही धोकादायक बाब आहे? नेतेमंडळीच जर अशी वागू लागली वा कार्यकर्ते त्यांच्याभोवती असा गोतावळा करू लागले, तर पुढील स्थिती निश्चितच धोकादायक आहे हे लक्षात ठेवावे.
समूह संसर्ग परवडणारा नाही
खरं तर नारायण राणे, दीपक केसरकर, परशुराम उपरकर यांच्यासारख्या हायरिक्सवाल्या नेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी अजिबात बाहेर पडू नये. तर अन्य नेत्यांनी परिस्थितीचे भान ठेवून सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा द्यावा वा कार्यकर्त्यांपासून काही काळ दूर राहणे आवश्यक आहे. झूम मिटिंग, वेबिनार व गरज पडल्यास सर्व ती खबरदारी घेऊन प्रशासनाशी संवाद ठेवणे उचित होईल. यात आणखी एक उपाय सुचवावासा वाटतो की, राजकीय नेत्यांपाठोपाठ घुटमळणाऱया कार्यकर्त्यांनी आता स्वत:ला कटाक्षाने आवर घातला पाहिजे. कारण हे कार्यकर्ते गावागावात फिरत असतात. त्यामुळे हा धोका गावापर्यंत पोहोचू शकतो. यातून एकदा का समूह संसर्गाचा उदेक झाला, तर मात्र परिस्थिती आपल्या हातात राहणार नाही. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आपणास पहिला धडा मिळाला आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा सावध’ या उक्तीनुसार जिल्हय़ातील सर्वच नेत्यांनी यातून बोध घेणे आवश्यक आहे.