महाविकास आघाडी, भाजपच्या नेत्यांनी मांडले विजयाचे गणित
कोल्हापूर / प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात चुरशीची लढत होत आहे. पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करून 415 पैकी तब्बल 263 हून अधिक मते मिळवून आपणच बाजी मारणार असल्याचा दावा केला. तर भाजप-ताराराणी आघाडीसह मित्र पक्षाकडे 165 मतांचा गठ्ठा असून आणखी 43 मते सहजपणे मिळवू शकतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. पण नेत्यांकडून मतांची गणिते' मांडली जात असली तरी
हातच्या’ मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या मतदारांनी आपल्याकडे राखीव ठेवला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जि.प.सदस्यांच्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. अनेक राजकीय घडामोडीमुळे आघाडीतील घटक पक्षांचे काही नेते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते मेळाव्यास उपस्थित राहतात की नाही ? याबाबत संदिग्धता होती. पण त्यांनी उपस्थिती दर्शवली व नाराजी व्यक्त करून मन देखील मोकळे केले. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही पालकमंत्री पाटील यांना पाठींबा जाहीर केला. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी कागलमधील 90 टक्के मतदान पालकमंत्री सतेज पाटील यांनाच मिळणार असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी इचलकरंजी येथे आयोजित बैठकीत महाडिक यांचा विजय निश्चत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. जो गरजते है, वो बरसते नही' असे खोचक विधान करून वाढीव मतांचा आकडा सांगणाऱयांपेक्षा आपलाच उमेदवार बाजी मारणार असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले. पण नेत्यांकडून सुरु असलेल्या या जुगलबंदीमध्ये मतदारांची भूमिका निर्णायक असून त्यांनी मतांच्या गणिताचा
हात’च्या आपल्याकडे राखीव ठेवला आहे.
विधानपरिषदेच्या रणधुमाळीत काही पक्षीय नेत्यांची भूमिका ही झाकली मुठ सव्वालाखाची' अशी दिसते. गोकुळच्या निवडणुकीत एकत्र आलेले हे नेते राज्याच्या राजकारणातून सध्या विरोधी व्यासपीठावर दिसत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र दुसऱया उमेदवाराचा
हात’ धरून प्रचारदेखील सुरु केला आहे. त्यामुळे नेता आपल्याकडे आहे, म्हणून त्यांच्याकडील मतांचा गठ्ठाही आपल्यालाच मिळणार, तो सांगेल तसाच `अंमल’ होणार असे गृहित धरणाऱया वरिष्ठ नेत्याचे गणित मात्र चुकण्याची शक्यता आहे.
विधापरिषदेच्या रिंगणात असलेल्या एक उमेदवाराने केवळ निवडणूक आली म्हणून मतदारांपर्यंत न पोहोचता, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्याच्याशी संपर्क ठेवला आहे. संबधित जि.प.सदस्य अथवा नगरसेवक कोणत्या गटाचा आहे, त्याचे पै-पाहुणे कोण आहेत ? तत्वे आणि विचारशैली कशी आहे ? अर्थकारण कसे आहे ? आपल्याकडून त्याला किती निधी दिला गेला आहे ? त्याचे मतदान आपल्याला मिळवण्यासाठी काय करायला हवे ? असा सुक्ष्म अभ्यास करून त्यानुसार नियोजन केले आहे. तसेच सदरचा सदस्य अथवा नगरसेवक कोणत्या गटाचा आहे, तो गटनेता आपल्यासोबत आहे, म्हणून ते मतदान आपल्याच मिळेल असे गृहित न धरता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे `गतीमान’ काम निवडणूक रिंगणातील एक उमेदवाराने केले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून बहुमताचा दावा केला जात आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपच्या गोटातील सर्व सदस्य येत्या आठवड्याभरातच सहलीवर जाणार आहेत. गेल्या चार दिवसांत काही सदस्य सहलीवर केले आहेत. तर लग्न, कौटुंबिक कार्यक्रम आदी कारणांमुळे अनेक सदस्य अद्याप कोल्हापूरातच आहेत. त्यामुळे आठ दिवसांत सर्व सदस्य सहलीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी सर्व मतदारांचे पर्यटन राज्यातच होणार आहे.