सर्वसामान्य म्हणताहेत, कोणता खड्डा चुकवू,
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणजे लिंब खिंड ते वर्ये रामनगर हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर अर्धा फुटाचे खड्डे पडलेले आहेत. नेमका कोणता खड्डा चुकवावा हे वाहनधारकांना समजत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातारा तालुक्यातील दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या गाडय़ा अलिशान आहेत त्यामुळे त्यांना खड्डय़ांचे दणके बसत नाहीत. सर्वसामान्य माणसांचे कंबरंडे जरी मोडले तरी त्याची तमा कोणालाही नाही. दोन वर्षापूर्वी काहीअंशी खड्डे भरले होते. पण पुन्हा रस्त्याची अवस्था तीच झाल्यामुळे खड्डे भरले की नुसती मलई खाल्ली असा सवाल परिसरातील नागरिक, वाहनधारक करत आहेत.
पुणे बाजूकडून सातारा शहरात येण्यासाठी लिंब खिंडीतून ब्रिज खालून विठ्ठल मंगल्म या कार्यालयाच्यासमोरुन पुढे रामनगर, वर्ये, वेण्णा पुलावरुन सैदापूर, मोळाचा ओढा करत मार्ग आहे. तोच जाण्यासाठी आहे. याच रस्त्याचा वापर बहुतांशी सर्वचजण करत असतात. मात्र, या रस्त्याकडे फारसे तालुक्यातील नेते मंडळींचे लक्ष नाही. दोन वर्षापर्वी पडलेले खड्डे मुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी काहीसे खड्डे मुजवले ही होते. वेण्णा पुलापर्यत रस्ता करण्यात आला. तेथून पुढे लिंब खिंडीपर्यंत सध्या खड्डेच खड्डे आहेत. त्यातील ब्रिजपासून ते विठ्ठल मंगलम मंगल कार्यालयापर्यंतचा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तेथून जे रामनगर, वर्येपर्यंत भले मोठे खड्डे आहेत. अगदी सहा चाकी ट्रकचे पाटे तुटत आहेत. अलिशान गाडय़ांचा वेग लगेच मंदावत आहे. अनेक अपघात या रस्त्यावरुन जाताना घडले आहेत. तरीही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. अनेकांनी तर रस्त्याचा मार्गच बदलला आहे. रस्ता मात्र दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. सातारा तालुक्यातील दोन्ही नेत्यांच्या अलिशान गाडय़ा आहेत. त्या गाडय़ांचा सुद्धा या खड्डय़ामुळे वेग मंदावला असेल काहीसा पण त्यांना त्यामुळे खड्डे जाणवले नसावेत, अशी चर्चा आहे.