प्रतिनिधी/ चिपळूण
नगर परिषदेतील राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. विरोधाला विरोध सुरू असून यात आपण आपल्याच नेत्यांनी निधी दिलेली कामे नाकारत आहोत, याचा विसर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना पडला आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या सभेत मंजुरी नाकारलेल्या मुरादपूर पुलासाठी आमदार शेखर निकम यांचा निधी असून शवदाहिनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत देणार आहेत. त्यामुळे आता हीच महत्वाची व आघाडीच्या नेत्यांनी पुढाकार घेतलेली कामे रखडण्याची शक्यता आहे.
शहराच्या वाहतूककोंडीसह अन्य बाबींचा विचार करता मुरादपूर पूल अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे तो व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. आमदार निकम यांनी अल्पावधीत हा विषय मार्गी लावून त्यासाठी सुमारे साडेनऊ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. तसे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषदेला दिले आहे. तसेच शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना प्रशासनाची होणारी कसरत नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सवेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनीही तत्काळ निधी देतो असे सांगून हा विषय मार्गी लावण्याचे मान्य केले. येथे एलपीजी गॅस शवदाहिनी बसवण्यासाठी सुमारे 80 लाख रूपये खर्च येणार आहे. या दोन्ही कामांसाठीच्या निधीचा प्रश्न आमदार निकम व मंत्री सामंत यांच्यामुळे निकाली निघाला आहे.
या दोन्ही कामांना पुढील दिशा मिळावी, यासाठी नुकत्याच झालेल्या सभेत हे विषय लावण्यात आले होते. विषयपत्रिकेवरील 13वा विषय 58/2 या नगराध्यक्षांच्या अधिकारातून झालेल्या शौचालये कामांची माहिती अवगत होण्यासाठी होता. मात्र काही नगरसेवकांनी याविरोधात ठराव करायचा आहे अशी भूमिका घेतली. यावर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी चर्चा करता येईल, नगरसेवकांचे म्हणणेही नोंद करू, मात्र नियमानुसार ठराव करता येत नाही, असा खुलासा केला. यावरून सभेत मोठे रणकंदन माजले आणि नगराध्यक्षा खेराडे यांनी पुढील विषय वाचा असा आदेश दिला. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये एकावेळी सर्वांनीच आपले माईक सुरू केल्याने पुढची काही मिनिटे काय घडले, हे कोणालाच समजले नाही आणि खेराडे यांनी 13 ते 17 सर्व विषय मंजूर म्हणत राष्ट्रगीत सुरू केले व सभा संपवली.
यामुळे पुन्हा गोंधळ झाला व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी डॉ. विधाते यांना पत्र देऊन 13 ते 18 या विषयांची चर्चा झाली नसल्याने आमची त्याला मंजुरी नाही. यामुळे या विषयांबाबत पुढील कार्यवाही करू नये, अशी मागणी केली आहे. यात वरील दोन कामांसह पाग येथील समाजमंदिर बांधणे, रामतीर्थ स्मशानभूमीचे नूतनीकरण, दुरूस्ती करणे या कामांचा समावेश आहे. मुळातच या गोंधळामुळे प्रशासन या कामांबाबत पुढील कार्यवाही करताना कायद्याचा आधार घेणार आहे. यात बराचवेळ जाणार असून पुढील सभा कधी होईल याचाही नेम नाही. त्यामुळे आपल्या नेत्यांनी निधी दिलेली कामे पहिल्यांदा करा, कारण सव्वा वर्षावर आलेल्या निवडणुकीत आम्हालाच त्याचा फायदा होणार आहे, अशी भूमिका आघाडीने घेणे अपेक्षित असताना त्या विरोधात दिलेल्या पत्रामुळे नागरिकांतून आर्श्चय व्यक्त होत आहे.
चर्चा न झाल्याने नामंजुरी: पालकर
या बाबत बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर म्हणाले की, आमच्या नेत्यांनी दिलेल्या निधीतून कामे झाली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. मात्र सभेत कोणतीही चर्चा, वाचन न करता जर अशा पध्दतीने वागले जात असेल तर आम्हाला ते मान्य नाही. या कामांच्या अनुषंगाने नगर परिषदेचा किती खर्च हेणार आहे, हेच सभागृहापुढे आलेले नाही. त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली आहे.
सभेत वाचन होऊन मंजुरी: खेराडे
या बाबत बोलताना नगराध्यक्षा खेराडे म्हणाल्या की, विरोधकांना चांगली कामे नको असल्याने ते नियम डावलून चुकीची मागणी करून सभेत गोंधळ घालत आहेत. ते जी कामे मंजूर नाहीत असे म्हणत आहेत त्या सर्व कामांचे सभेत वाचन झाले असून त्यांनी त्यावर कोणतेही मत नोंदवले नसल्याने आम्ही ती मंजूर केली आहेत. गोंधळ घालणाऱयांना चांगले ऐकू जात नाही, हे यावर स्पष्ट होत असून त्यांना शहरातील महत्वाची कामे नको असतील तर ते अंतिम चर्चेवेळी त्यांचा निर्णय घेतील.