मंत्री गोविंद गावडे यांचे उद्गार : फोंडय़ातील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /फोंडा
डोळे हे शरीराचे महत्त्वाचे अवयव आहेत. आपली दृष्टी चांगली असल्यास सुंदर अशा या सृष्टीचा आपण योग्यप्रकारे आनंद घेऊ शकतो. राज्य सरकार गोव्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेत असून त्याचाच भाग म्हणून ‘व्हिजन फॉर ऑल’ हा नेत्रचिकित्सा उपक्रम आयोजित केला आहे. यामागे सरकारची दूरदृष्टी आहे, असे उद्गार कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
आरोग्य संचालनालयाच्या सहकार्याने व्हिजन फॉर ऑल या कार्यक्रमांतर्गत फोंडा येथील कला मंदिरमध्ये आयोजित नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रसाद नेत्रालया उडुपी व कलरकॉन एशिया प्रा. लि. गोवा या आस्थापनांच्या सहकार्याने फोंडा तालुक्यातील नागरिकांसाठी हे एक दिवशीय शिबिर नुकतेच आयोजिण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी मुख्यमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, आरोग्य खात्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपा नायक, फोंडा उपजिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, शिबिराचे समन्वयक सूरज नाईक, प्रसाद नेत्रालयाच्या डॉ. निओमी डिकॉस्ता, फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, शिरोडा भाजपचे अध्यक्ष सूरज नाईक, मडकईचे अध्यक्ष प्रदीप शेट, बेतकी खांडोळाचे सरपंच दिलीप नाईक व ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. मनोहर आडपईकर व्यासपीठावर उपस्थित होते.
दिशाभूल करणाऱया योजनांपासून सावध राहा
सर्वाधिक लोककल्याणकारी योजना राबविणारे गोवा हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. कुठलीही योजना जनतेचा सहभाग व सहकार्याशिवाय सफल होऊ शकत नाही, असे मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर काही स्थानिक पक्षांनी बाहेरील पक्षांशी संधान साधून गोवा विकायला काढल्याचा आरोप त्यांनी केला. गृहलक्ष्मीसारख्या योजना जनतेची दिशाभूल करणाऱया असून लोकांनी त्यांना बळी पडू नये. त्यांच्यापासून सावध राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. रवी नाईक म्हणाले, प्रत्येकाने वेळोवेळी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा शिबिरातून जनतेचा पैसा सरकार योग्यप्रकारे जनहितासाठी खर्च करीत आहे. डॉ. रुपा नाईक यांनी दृष्टिदोषापासून प्रत्येकाने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. वेळोवेळी तपासण्याकरून डोळय़ांच्या आजारापासून आपण सुरक्षित राहू शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब ही दृष्टिदोषामागील काही महत्त्वाची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. सूरज नाईक यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. शांताराम कोलवेकर यांनी स्वागतपर भाषणात किमान दोन हजार नागरिकांना या शिबिराचा लाभ होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कवळेकर यांनी तर डॉ. स्मिता पार्सेकर यांनी आभार मानले.