सीमेवर तणाव, तिघे जखमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नकाशाच्या माध्यमातून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचे स्वप्ने पाहणाऱया नेपाळच्या सैनिकांनी बिहारमधील जानकीनगर सीमेवर गोळीबार केला. यामध्ये सीमा परिसरातील शेतात काम करणाऱया भारतीय युवकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिले.
भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी सशस्त्र सीमा दलावर आहे. बिहारमधील सीतामढी जिल्हय़ातील सोनबरसा सीमा परिसरात जानकीनगर गावातील सीमेनजीकच्या शेतात शेतकरी काम करीत होते. नेपाळच्या सैनिकांनी त्यांना मज्जाव करत सुमारे 15 गोळय़ा झाडल्या. यातील 10 गोळय़ा हवेत झाडल्या. यामध्ये गावातील 25 वर्षीय विकेश कुमार राय याचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. आतापर्यंत सीमेवर मारहाणीच्या घटना घडल्या; पण प्रथमच गोळीबाराची घटना घडल्याची माहिती सशस्त्र सीमा दलाच्या सूत्रांनी दिली.
गोळीबारात मृत्यू झालेल्या विकेश राय याचे वडील नागेश्वर राय यांनी सांगितले की, नेपाळ सीमेनजीक आमचे शेत आहे. माझ्या मुलासह गावातील सहा जण शेतात कामासाठी गेले होते. नेपाळ सशस्त्र पोलिसांच्या जवानांनी त्यांना शेतात काम करण्यापासून रोखले. यावेळी त्यांनी 15 गोळय़ा झाडल्या. यात मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सीमेवर दोन्ही देशांचे पोलीस तैनात आहेत. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी या भारतीय परिसराचा नेपाळच्या नकाशात समावेश करण्याचा निर्णय नेपाळच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर या संदर्भातील विधेयक नेपाळने मागे घेतले होते.