ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण असतानाच नेपाळमध्येही भारतविरोधी वातावरण तयार केले जात आहे. नेपाळच्या धारचुवला एफएम वाहिनीवर भारतविरोधी भाषणे आणि गाणी वाजवली जात असल्याचे समोर आले आहे.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून जसा भारत-चीन वाद सुरू आहे, तसा नेपाळसोबत लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भागावरून वाद आहे. 15 जुनला भारत-चीन सैन्यातील हिंसक संघर्षानंतर चीनने नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर नेपाळमध्ये भारतविरोधी वातावरण तयार करण्यात येत आहे.
भारताच्या हद्दीतील लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे तीन भाग नेपाळने आपल्या हद्दीत दाखवून नवीन नकाशा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मंजूर केला आहे. भारताने हे भाग कशाप्रकारे नेपाळकडून बळकावले होते या धर्तीवर काही गाणी नेपाळच्या धारचुवला एफएम वाहिनीवर वाजवली जात आहेत. तसेच तेथे सोशल मीडियावरही अशी गाणी व्हायरल झाली आहेत. उत्तराखंडच्या काही एफएम वाहिन्यांवरही अशा प्रकारची गाणी ऐकू आली आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.