नवी दिल्ली
भारताच्या तीन दिवसीय दौऱयावर आलेले नेपाळचे विदेशमंत्री प्रदीप कुमार ज्ञवाली यांनी शनिवारी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आहे. यापूर्वी ज्ञवली यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा केली होती. यादरम्यान दोन्ही देशांचा संयुक्त आयोग म्हणजेच जेसीएमची बैठक झाली आहे. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली.
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या संबंधांमधील तणाव निवळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील वर्षी नेपाळकडून भारतीय भूभागावर दावा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादानंतर दोन्ही देशांदरम्यान झालेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे. नव्या नकाशाच्या वादात नेपाळमधील चीनच्या थेट हस्तक्षेपामुळे अधिकच भर पडली होती. परंतु दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत द्विपक्षीय आर्थिक संबंधांशी संबंधित सर्व मुद्दय़ांसह सीमा वादावरही चर्चा झाली आहे. संपर्कयंत्रणा, अर्थव्यवस्था, व्यापार, ऊर्जा, तेल तसेच वायू, जलसंपदा, राजकीय आणि सुरक्षेशी संबंधित विषय, सीमा व्यवस्थापन, पर्यटनासह सहकार्याच्या अनेक पैलूंवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.