बिहारमध्ये गंडक नदी धोक्याच्या पातळीवर : पूरसंकट शक्य
वृत्तसंस्था /पाटणा
नेपाळच्या तराई आणि पर्वतीय क्षेत्रांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील सिंधुपाल्चोक जिल्हय़ात गुरुवारी 3 भारतीयांसह 20 जण बेपत्ता झाले आहेत. नेपाळमधील पुराचा प्रभाव बिहारच्या सीमावर्ती भागांमध्येही दिसून येत आहे. गंडकसमवेत अन्य नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. गोपालगंज जिल्हय़ावर पुराचे संकट घोंगावत आहे.
भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक भागांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता गुरुवारी वर्तविली आहे. यात पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकासह अनेक राज्ये सामील आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पुढील काही दिवस पाऊस पडण्याचा अनुमान आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
बिहारमध्ये रेड अलर्ट
बिहारच्या गंडक नदीतील जलपातळी वाढल्याने पूर्व आणि पश्चिम चंपारण्यासह सारण जिल्हय़ाच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूर्व-पश्चिम चंपारण्य आणि गोपालगंज जिल्हय़ांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर्ण बिहारमध्ये 18 जूनपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 7 जिल्हय़ांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. यात पाटणा, गया, नवादा, नालंदा, शेखपुरा, बेगूसराय आणि लखीसराय सामील आहे. तर बेतियातील कित्येक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचा वाढता धोका पाहता एनडीआरएफ सक्रीय झाले आहे. पाटण्यासह एकूण 9 जिल्हय़ांमध्ये 10 पथकांना तैनात करण्यात आले आहे.