ऑनलाईन टीम / पटना :
भारत-नेपाळ सीमेवरील गंडक बराज धरणाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र, नेपाळने या धरणाजवळ भारतीय अभियंत्यांना प्रवेश नाकारला आहे. धरणाच्या डागडुजीचे काम अपुरे राहिले तर बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक आहे, असे बिहारचे जलसंपदा मंत्री संजय झा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
झा म्हणाले, गंडक बराज धरणाला सध्या डागडुजी करण्याची गरज आहे. डागडुजीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची ने-आण करण्यावर नेपाळने निर्बंध आणले आहेत. तसेच भारतीय इंजिनियर्सला धरणाजवळ प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे धरणाची डागडुजी करता येणार नाही. तसे झाल्यास पावसाळ्यात गंडक नदीची पाण्याची पातळी वाढेल आणि बिहारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.
लाल बेकिया नदीजवळ धरणाच्या डागडुजीचे काम केले जात आहे. हा प्रदेश कोणत्याही देशाच्या अंतर्गत येत नाही. तरी देखील नेपाळने ठिकाणी डागडुजीची कामे थांवबली आहेत. गंडक बराज धरणाला ३६ दरवाजे आहेत. त्यापैकी १८ दरवाजे हे नेपाळमध्ये आहेत.