संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांचा विश्वास : नकाशाचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळ या शेजारी देशाने भारताचा काही भाग त्याच्या नकाशात दाखविल्याने सध्या मोठे वादळ उठले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात सौदार्हाचे संबंध असून चर्चेच्या माध्यमातून सर्व मतभेद मिटविण्यात येतील असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी केले. हा मुद्दा गंभीर असला तरी त्यावर तोडगा शक्य आहे, असा आशावाद त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
भारताच्या उत्तराखंड या राज्याच्या उत्तर टोकाचा काही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवि ला आहे. या प्रकाराला चीनची फूस आहे. सध्या चीन कोरोनाच्या उद्रेकामुळे जगाच्या संशयाला कारणीभूत ठरला आहे. या विषाणूचा उद्रेक प्रथम चीनमध्ये झाला असतानाही त्याने जगाला वेळीच सावध केले नाही. परिणामी जगात सर्वत्र या विषाणूने थैमान घातले, असा आरोप होत आहे.
लक्ष वळविण्याचा प्रयत्न
या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी चीनने भारताबरोबरचा सीमावाद उकरून काढला असे जागतिक तज्ञांचे मत आहे. या वादात चीनने नेपाळलाही ओढल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान ओली हे चीनच्या ओंजळीने पाणी पिणारे मानले जातात. मात्र नेपाळ हे चारी बाजूंनी भूमिवेष्टित राष्ट्र असल्याने सागरी व्यापारासाठी त्याला भारतावरच प्रामुख्याने अवलंबून रहावे लागते, अशी स्थिती आहे.
त्यामुळे संघर्ष अधिक ताणणे त्या देशाला जमणार नाही, असाही सूर आहे. भारताने कौशल्याने परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रयत्न सुरू केला आहे. नकाशात बदल करण्याच्या प्रस्तावावर नुकतेच नेपाळच्या संसदेत मतदान झाले असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तापला आहे. मात्र नेपाळला चीनची साथसंगत लाभदायक ठरणार नाही, असे अनेक तज्ञांचे मत असल्याचे समजून येते, अशीही चर्चा आहे.