ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्याला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला असून, त्याला पिलभीत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा एक मित्र अद्याप बेपत्ता आहे. पिलीभीतचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी यासंदर्भात माहिती दिली.
जयप्रकाश म्हणाले, नेपाळ सीमेवरच्या टिल्ला क्रमांक 4 या गावातील गोविंदा (वय 26) नामक तरुण आपले मित्र गुरमेज आणि पप्पूसोबत नेपाळमध्ये गेले होते. त्यावेळी नेपाळ पोलिसांशी त्यांचा वाद झाला. दरम्यान, नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गोविंदा नामक तरुणाचा मृत्यू झाला. त्याचवेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका मित्राने सीमारेषा पार केल्याने तो बचावला. मात्र, झटापटीत जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एक तरुण अद्याप बेपत्ता आहे. या घटनेनंतर भारत आणि नेपाळच्या सीमेवर एसएसबीला अलर्ट करण्यात आले आहे.