मळगाव-नेमळे हद्दीलगत जंगलात घेतला गळफास
सावंतवाडी:
नेमळे-एरंडवाकवाडी येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या समीर बाळकृष्ण धावडे (29) या युवकाने झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-नेमळे हद्दीrवरील रस्त्यालगतच्या जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. मृतदेह सडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता. समीर हा अविवाहित होता. तो मोलमजुरी करून कुटुंबियांना मदत करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
समीर हा 14 जुलैला सायंकाळी घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. रात्री तो जेवणासाठी आला नाही म्हणून नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. शोध न लागल्याने त्याचा भाऊ एकनाथ याने बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात समीर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. रविवारी सायंकाळी घरापासून 20 मीटर अंतरावर असलेल्या झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-नेमळे रस्त्यानजीक जंगलमय भागात तेथील एका
ग्रामस्थाला कुजल्याचा वास येऊ लागल्याने त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्ती दिसून आली. त्याने या घटनेची माहिती सरपंच व पोलीस पाटलांना दिली.
या घटनेची माहिती तेथील ग्रामस्थ अरुण राऊळ यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली. रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, हवालदार महेश जाधव, प्रसाद कदम, गावडे यांनी घटनास्थळी खातरजमा केली. अनोळखी व्यक्ती शर्टच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत होती. पोलिसांनी समीर याच्या नातेवाईकांना बोलावले. नातेवाईकांनी कपडय़ावरून सदरचा मृतदेह समीरचाच असल्याची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाचा परिसर व त्याच्या अंगावरील शर्ट, पॅन्टमध्ये चिठ्ठी अथवा संशयास्पद काही आढळले नाही. त्यामुळे आत्महत्येमागचे कारण तपासात स्पष्ट झाले नाही. त्याच्या कुटुंबियांनीही संशय व्यक्त केलेला नाही, अशी माहिती हवालदार महेश जाधव यांनी दिली. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.