खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नेरसा, गवाळी रस्त्यावर असलेल्या भांडुरा नाला तसेच म्हादई नदीवर लोखंडी पूल उभारण्यास अखेर वनखात्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे पावसाळय़ानंतर दोन्ही ठिकाणी लोखंडी पूल उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणच्या पूल मंजुरीस तसेच यासाठी आवश्यक असलेली वनखात्याची परवानगी मिळविण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांचे विशेष प्रयत्न कारणीभूत आहेत.
नेरसा ते गवाळी रस्त्यावरील भांडुरा नाला तसेच म्हादई नदीला पावसाळय़ात पूर आला की हा रस्ता वाहतुकीला बंद होतो. यामुळे गवाळी, पास्टोली, कोंगळा या तिन्ही गावांचा तालुक्याच्या इतर भागाशी संपर्क तुटून जनतेला बऱयाच अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तिन्ही गावचे नागरिक म्हादई नदी तसेच भांडुरा नाल्यावर लाकडी साकव बांधून ये-जा करत होते. पण अनेक वेळा लाकडी साकव पुराच्या पाण्यात वाहून जात होते किंवा तुटून पडत होते. अशा वेळी गावकऱयांना पावसाळा संपेपर्यंत बऱयाच अडचणींचा सामना करण्याची वेळ येत होती. मध्यंतरी म्हादई नदीवर निजद नेते नासीर बागवान यांनी स्वखर्चाने लोखंडी साकव घालून दिले होते. पण ते एका पावसाळय़ात नादुरुस्त झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. त्या दोन्ही ठिकाणी पूल बांधण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण ते अयशस्वी ठरले. यामुळे दोन वर्षांपूर्वी आमदार अंजली निंबाळकर यांनी भांडुरा नाला तसेच म्हादई नदीवर कायमस्वरुपी लोखंडी पूल उभारण्यासाठी 80 लाखाचे अनुदान मंजूर करून आणले. पण वनखात्याने आडकाठी आणल्याने लोखंडी पूल उभारणीचे काम सुरू करता आले नाही. अखेर आमदारांनीच यासाठी वनखात्याकडे विशेष प्रयत्न करून दोन्ही पुलांच्या उभारणीस परवानगी मंजूर करून घेतली. आता पूल उभारणीचे काम सुरू करण्यासाठीची अडचण दूर झाली आहे. पावसाळा संपताच त्या कामाला सुरुवात होणार आहे. या पुलावरून दुचाकी, रुग्णवाहिका, जीप, ट्रक्टर यासारखी वाहने ये-जा करू शकतात. यापूर्वी तालुक्यातील लोंढा-सातनाळी रस्त्यावरील पांढरी नदीवर लोखंडी पुलाची उभारणी करण्यात आली आहे.