गोवा फॉरवर्डचे जगदीश भोबे यांचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
सुमारे 750 शेतकऱयांच्या संसारावर नांगर फिरवून मासळी माफियांचे भले करण्यासाठीच सरकारकडून नेवरा खाजन शेतीला बांध बांधण्यात दिरंगाई होत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते जगदीश भोबे यांनी केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी माजी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी महसूल आणि कृषी या खात्यांशी समन्वय साधून सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी खारे पाणी घुसल्याने शेतीची नाशाडी होत आहे, असे भोबे यांनी सांगितले.
या प्रकरणात मामलेदारांकडून स्थानिक लोकांना सहकार्य मिळत नाही. या मानसीचा लिलाव होणे आवश्यक आहे. परंतु मासळी माफियांच्या फायद्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठीच लिलाव पुकारण्यात येत नाही. या प्रकरणात स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचाही सहभाग असल्याचा आरोप भोबे यांनी केला.
सदर बांधाची दुरुस्ती करण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे. यापूर्वी या बांधाच्या दुरुस्तीच्या नावाने सुमारे 9.5 कोटीचा घोटाळा झाल्याचा दावाही भोबे यांनी केला.