‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींचा नारा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘देश लवकरच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करणार आहे. महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे ‘भारत छोडो’ आंदोलन केले होते, त्याप्रमाणे आपल्याला या वर्षापासून ‘भारत जोडो’ आंदोलन करणे आवश्यक आहे. ‘देश प्रथम, नेहमी प्रथम’ (नेशन फर्स्ट, ऑल्वेज फर्स्ट) हाच आपल्यासाठी मंत्र आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात काढले आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी आकाशवाणीवरुन करण्यात आले.
येत्या 15 ऑगस्टला आपण आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हे वर्ष देशात विशेष उत्साहाने साजरे केले जाईल. देशाच्या एकात्मतेवर आपण भर दिला पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने सरकारने आणि इतर संस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध समाजोपयोगी प्रकल्पही आकाराला येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रम
75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना अधिकतम किंवा जास्तीत जास्त लोकांनी एकत्रित राष्ट्रगीत म्हणावे अशी एक अभिनव योजना ठरविण्यात आली आहे. यासाठी http://rashtragan.in ही बेबसाईट निर्माण करण्यात आली आहे. वेबसाईटवर या कार्यक्रमाची अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणीही याच वेबसाईटवर केली जाऊ शकते. शक्य तितक्या लोकांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ऑलिंपिक वीरांना प्रोत्साहन द्या
सध्या भारतीय खेळाडूंचे पथक टोकियोला ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत आहे. या खेळाडूंना सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आहेतच. पण स्पर्धा संपेपर्यंत सर्वांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठबळ देणे आवश्यक आहे. सोशल मिडियावरुन खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी ‘व्हिक्टरी पंच कँपेन’चा प्रारंभ करण्यात आला आहे. यावर आणि आपल्या खेळाडूंना आणि संघाला शुभेच्छा आणि प्रोत्साहन देऊ शकता, अशाही महत्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. या ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱया मीराबाई चानू यांचे त्यांनी अभिनंदन केले.
कारगिल विजय दिन
आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस आहे. 1999 मध्ये याच दिवशी कारगिल भागात घुसखोरी केलेल्या पाक सेनेला भारताने माघार घ्यावयास लावली होती. या दिनी सर्व भारतीयांनी भारताची मान उंचावणाऱया शूर सैनिकांना अभिवादन करावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
मन की बात विषयी…
मन की बात या कार्यक्रमासाठी लक्षावधी लोक सूचना पाठवितात. त्या सर्व स्वीकारणे अशक्य आहे. तथापि, महत्वाच्या सूचनांचा विचार आवश्य केला जातो. तसेच अनेक सूचना पुढील कार्यवाहीसाठी सरकारच्या विविध विभागांना पाठविल्या जातात. सूचना करणाऱयांपैकी 75 टक्के नागरिक 35 वर्षे वयाच्या आतील आहेत. हा कार्यक्रम सकारात्मकता आणि एकात्मता यांचे प्रतीक बनला असून हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी…
ड देशाला प्रथम महत्व हा संकल्प स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात करा
ड अमृत महोत्सवानिमित्ताने क्रियान्वित झालेल्या योजनांमध्ये सहभागी व्हा
ड ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय संघाला प्रोत्साहन देत रहा
ड मन की बात या कार्यक्रमाला विविध रचनात्मक सूचना आवश्यक करा