वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रात कार्यरत असणाऱया नेस्ले इंडियाने कोरोना महामारीच्या काळात छोटय़ा शहरात चांगला व्यवसाय केला असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या विकासासाठी छोटय़ा शहरांनी दिलेले योगदान लक्षात घेण्याजोगे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले की, कंपनीने टायर टू, टायर थ्री आणि टायर फोर शहरांमध्ये विक्रीत चांगली वाढ दर्शवली आहे. या शहरातील ग्राहकांनी नेस्लेच्या उत्पादनांना मागणी नोंदवली असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा शहरीपेक्षा ग्रामीण भागांतील लोकांनी नेस्लेच्या उत्पादनांना पसंती दर्शवली आहे. मागणीतील वाढीमुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढीची शक्यता नाकारता येत नाही. 1 ते 5 लाख लोकसंख्या असणाऱया शहरांमध्ये उत्पादनांच्या मागणीत चांगली वाढ दिसली आहे. कोरोनाकाळात या शहरांनी कंपनीला चांगला हात दिला आहे. या शहरांनी नोंदवलेली मागणी अधिक वाखाणण्याजोगी म्हणता येईल.