गटारीचे बांधकाम नसल्याने समस्या : रोगराई पसरण्याची भीती, दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना दुसरीकडे मात्र शहरातील समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. नेहरुनगर बसवाण्णा मंदिरसमोर डेनेजमिश्रीत पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. आझमनगर, एपीएमसीकडे जाणाऱया नागरिकांना याच पाण्यामधून जाण्याची वेळ आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नेहरुनगरच्या उतारावरून डेनेजमिश्रीत पाणी आझमनगर मुख्य रस्त्यावर येत आहे. उतार असल्यामुळे गटारीतील पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या ठिकाणी गटारीचे पक्के बांधकाम नसल्यामुळे पाणी जाण्यास वाव नाही. प्रत्येक पावसाळय़ात पाऊस जास्त पडला की या ठिकाणी दरवर्षी पाणी भरत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
मनपाची डोळेझाक का? नेहरुनगर येथील सर्व पाणी या सखल भागात मोठय़ा प्रमाणात वाहून येत आहे. उतार असल्याने सर्व पाणी वाहून येऊन एपीएमसी रस्त्याकडे जात आहे. पाणी जाण्यास वाव नसल्याने तसेच गटारीचे बांधकाम नसल्याने हे पाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. नागरिकांनी तक्रार करूनही मनपाकडून या समस्येकडे डोळेझाक केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.