रविवारपासून प्रवासी वाहतूक होणार सुरळीत
प्रतिनिधी/ बेळगाव
दूधसागरनजीक शुक्रवारी सकाळी कोसळलेली दरड बाजूला करण्यात नैर्त्रुत्य रेल्वेला यश आले. यामुळे शनिवारी दुपारपासून लेंढा-वास्को या मार्गावरील मालवाहतूक सुरू करण्यात आली. रविवारपासून रेल्वे नियोजित वेळेनुसार धावण्याची शक्मयता आहे.
शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास दूधसागरनजीक दोन ठिकाणी दरड कोसळली. एका ठिकाणी थेट रेल्वेवर दरड कोसळल्याने रेल्वे इंजिन रूळाबाहेर गेले. तेव्हापासून माती बाजूला करणे, रेल्वेचे डबे व इंजिन रूळावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. नैर्त्रुत्य रेल्वेचे 100 हून कर्मचारी, तांत्रिक अधिकारी कार्यरत होते. हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे अधिकारी अरविंद मालखेडे यांच्या नेतृत्वाखाली माती बाजूला करण्यात आली.
बेळगाव – मिरज रेल्वेमार्ग अद्याप बंदच
हुबळी – बेळगाव मार्गावर अळणावर जवळ शुक्रवारी नाल्याचे पाणी रेल्वेरूळावर आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परंतु पाणी कमी झाल्याने शनिवारी मार्ग मोकळा करण्यात आला. बेळगाव- मिरज मार्गावर पाश्चापूरजवळ नाल्याचे पाणी रूळाच्याजवळ आले असल्याचे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक शुक्रवारपासून बंद होती. शनिवारी रात्रीपर्यंत हा मार्ग बंदच ठेवण्यात आला होता. धोका नसेल तरच रविवारपासून हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
अनिश हेगडे (मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)
दूधसागर जवळ कोसळलेली दरड बाजूला करून रेल्वेमार्ग मोकळा करण्यात नैर्त्रुत्य रेल्वेला यश आले आहे. शनिवारी दुपारपासून मालवाहतूक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. पाश्चापूरजवळ रेल्वे ब्रिजजवळ पाणी आले असून अधिकारीवर्ग पाहणी करत असून त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यास बेळगाव- मिरज मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे अनिश हेगडे यांनी सांगितले.