नैमित्तिक करारापोटी तिकीट दर चौपट पडतो
त्यापेक्षा 22 प्रवाशांकडून दुप्पट भाडे परवडणारे
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेली एसटी सेवा कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत पुरती अडचणीत आली. मालवाहतुकीच्या माध्यमातून एसटी महामंडळाने एसटीला जगविण्याचा तात्पुरता प्रयत्न सुरू केला असला, तरीही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली ही एसटी सेवा आजही प्रवासी सेवेच्या प्रतीक्षेत आहे. लॉकडाऊनमुळे एसटीला जिल्हय़ाबाहेर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली जात नाही. केवळ नैमित्तिक कराराच्या माध्यमातून एसटी जिल्हय़ाबाहेर प्रवासी नेऊ शकते. मात्र, यासाठी मूळ तिकिटाच्या सुमारे चौपट रक्कम प्रवाशांना भरावी लागले. याऐवजी नैमित्तिक कराराप्रमाणेच नियम व अटींचे पालन करून 22 प्रवासी वाहतूक करायची असल्याने दुप्पट दर आकारत वाहतूक करण्याचा पर्याय का स्वीकारला जात नाही? दुसरीकडे खासगी बसेस प्रवासी वाहतुकीसाठी जाहिराती करताना दिसत असल्याने यातील नेमके गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर 22 मार्चपासून एसटी महामंडळाची सेवा बंद झाली. सुमारे दोन महिने बंद राहिलेली बससेवा नंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न आजही सुरू आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ांतर्गतच बससेवा सुरू आहे. जिल्हय़ाबाहेर प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी अद्याप रा. प. महामंडळाला देण्यात आलेली नाही. केवळ नैमित्तिक कराराच्या माध्यमातून पासेस काढून 22 प्रवासी संख्येएवढे प्रवासी दुसऱया जिल्हय़ात नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
56 रु. प्रति किमीने नैमित्तिक करार
रा. प. महामंडळाच्या सूत्रांशी संपर्क साधला असता, 56 रु. प्रति किमी अधिक जीएसटी या दराने नैमित्तिक कराराची बस उपलब्ध होते. आज लॉकडाऊननंतर याच नैमित्तिक कराराने प्रवासी वाहतूक जिल्हय़ाबाहेर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित प्रवाशांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड घेऊन पासची प्रक्रिया पूर्ण करून 22 प्रवाशांना घेऊन बस जाऊ-येऊ शकते. मात्र, त्यानुसार 22 प्रवाशांना प्रति किमीच्या भाडय़ाने दर काढला, तर मूळ तिकिटाच्या सुमारे चौपटपर्यंत रक्कम भरावी लागते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत जिल्हय़ातून तीन बसेस बाहेर
या नैमित्तिक कराराच्या माध्यमातून महिनाभरापूर्वी रा. प. महामंडळाला परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत जिल्हय़ाबाहेर केवळ तीनच बसेस जाऊ शकल्या आहेत. यात सावतंवाडीतून पुण्यासाठी दोन, तर देवगडहून पावस-रत्नागिरीला एक अशा बसचा समावेश आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात एसटीने इतर जिल्हा, राज्याच्या सीमेपर्यंत सुमारे 55 फेऱया सोडल्या होत्या. मात्र, नैमित्तिक करारात तिकिटाच्या रकमेतील तफावतीमुळे प्रवासी एसटीकडे वळताना दिसत नाहीत.
नैमित्तिकमुळे कोरोना प्रसार रोखतो?
एसटीच्या नैमित्तिक करारासाठीचा दर अधिक आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे आलेल्या अटीनुसार सोशल डिस्टन्सिंग पाळायचे असल्याने प्रवासी संख्येच्या निम्मे म्हणजेच 22 प्रवाशांचीच वाहतूक करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. यासाठी पासेससह सर्व प्रक्रिया पूर्ण असण्याची गरज आहे. दुसरीकडे खासगी बसवाले जिल्हय़ाबाहेर बसेस वाहतुकीसाठी नियम, अटींच्या पालनासहीतची जाहिरात करताना दिसतात. एसटी केवळ नैमित्तिक करारात अडकली आहे. एसटीने 44 प्रवासी संख्येऐवजी 22 प्रवाशांकडून 44 प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम घेऊन प्रवास केला, तरीही सध्या बसणाऱया तिकिटाच्या चौपटीपेक्षा निम्मे म्हणजे मूळ तिकिटाच्या दुप्पट प्रवासभाडे बसेल मात्र याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. जिल्हय़ाबाहेर परवानगीच नसती, तर ठिक पण परवानगी आहे, पण केवळ नैमित्तिक कराराला. त्यामुळे हे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे.