विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत
प्रतिनिधी /कराड
गेल्या दोन वर्षात राज्यावर तीनवेळा नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. आपत्तींचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीत भूस्खलनाचे वाढलेले प्रमाण पाहता भूगर्भाचा अभ्यास तज्ञांच्या मदतीने करावा लागेल. मी मुख्यमंत्री असताना जागतिक बँकेच्या साहाय्याने धरणे, नद्यांचे पाणी कॅनॉलने दुष्काळी भागांना देण्याची योजना आखली होती. ही योजना पूर्ण होण्यास 7 वर्षे लागली असती. मात्र यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय सद्यस्थितीत दिसत नाही. वर्षाचा पाऊस तीन दिवसांत पडतो. महिन्याचा पाऊस एका दिवसात पडू लागला आहे. नदी, नाल्यांची पाहणी वाहून नेण्याची क्षमता तेवढीच आहे. यात धरणांचा विसर्ग सुरू झाला की महापुराला लोकांना तेंड द्यावे लागत आहे. भूस्खलनाचे प्रमाण वाढल्याने याबाबत अभ्यास करून नव्याने मॅपिंग करावे लागेल. भूगर्भात काही तरी हालचाली होत आहेत, याचा अभ्यास करावा लागेल. शासनाकडे अनेक अभ्यासकांचे, तज्ञांचे अहवाल येत असतात. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यासाठी अशा अहवालांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 1980 नंतर नागरीकरण वाढत गेले. यात नैसर्गिक नाल्यांचा मोठय़ा प्रमाणात बळी गेला. नदीपात्रात प्रचंड अतिक्रमणे झाली. 2000 सालानंतर यात जागृती वाढत गेली. मात्र सध्याचे महापुराचे संकट पाहता पूरस्थितीचा विचार करून घरांचे बदल करण्यास परवानगी दिली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने 11 हजार मतांनी मिळवलेल्या विजयाबद्दल डॉ. अतुल भोसले यांचे कौतुक त्यांनी केले. कृष्णा रूग्णालयाने कोविड काळात जिल्हय़ाला चांगली सेवा दिल्याचे सांगत त्यांना संधी देण्याबाबत सुतोवाच केले.