गोव्यात प्रवेश नाकारल्याने बांद्यात रास्ता-रोको
कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्यासच प्रवेश
डंपर वाहतूक खुलेआम, आम्हालाच का अटकाव?
बांदा सरपंचांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
प्रतिनिधी / बांदा:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्याने दररोज नोकरीसाठी ये-जा करणाऱयांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करत त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त नोकरदार युवक-युवतींनी महाराष्ट्र हद्दीत माघारी परतत गोव्यात जाणारी व गोव्यातून येणारी वाहतूक रोखून धरली. आम्ही रोजगारासाठी येतो, म्हणून कोरोना चाचणी करायला सांगता. मात्र, डंपर व अन्य वाहतूक सुरू आहे, त्यांना कोणतेच निर्बंध नाहीत, हा कोणता न्याय, असा सवाल केला. नोकरदारांना प्रवेश मिळणार नसेल तर कोणतीच वाहतूक होऊ देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. सुमारे दोन तास वाहतूक रोखून धरली.
गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गोवा सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. गोव्यात प्रवेश हवा असल्यास कोरोना निगेटिव्ह अहवाल गरजेचा करण्यात आला. अहवाल नसल्याने बुधवारी सकाळी गोव्यात नोकरीसाठी ये-जा करणाऱया अनेकांना माघारी पाठविण्यात आले. तर काहींना गुरुवारपासून कडक निर्बंध करण्यात येतील. कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरीसाठी ये-जा करणारे हजारो लोक गोव्यात निघाले. मात्र, गोवा पोलिसांनी त्यांना कोरोना चाचणी अहवाल नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगून माघारी पाठविले.
माघारी परतत रास्ता-रोको
माघारी पाठविण्यात आलेल्या युवक-युवतींनी महाराष्ट्र हद्दीत येऊन ठाण मांडले. यावेळी खडी, वाळूची डंपर वाहतूक सुरू होती. त्यांचा कोरोना अहवाल विचारला जात नव्हता. अन्य वाहतूकही विनानिर्बंध सुरू होती. त्यामुळे संतप्त नोकरदारांनी आम्हाला प्रवेश नाही तर कोणतीच वाहतूक होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत रास्ता-रोको केला.
आम्हालाच सक्ती का?
यावेळी दोन्ही बाजूला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्याने गोवा व सिंधुदुर्ग पोलीस दाखल झाल. यावेळी उपस्थितांनी आपली बाजू मांडत जर आम्ही नोकरी साठी गोव्यात येऊन कोरोना प्रसार होत असेल तर मग गोव्यातील इतर वाहतूकही बंद करा. डंपर वाहतूक करणारे किती दिवसांनी कोरोना चाचणी करतात, असा सवाल केला. सुमारे दोन तासांहून अधिक वेळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा उपस्थितांनी घेतला.
सरपंच खान यांची धाव
याबाबत माहिती मिळताच बांदा सरपंच अक्रम खान आणि उपसभापती शीतल राऊळ यांनी तेथे जात युवकांशी चर्चा केली. सरपंच खान यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करू. जिल्हा प्रशासनानेही यात लक्ष घालणे आवश्यक असल्याचे सांगितले. गतवर्षीप्रमाणेच सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आम्हाला कंपनीने कामावरून काढून टाकले, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत आम्ही चोऱया करायच्या की आत्महत्या करायची, असा सवालही उपस्थित केला. यावेळी शिरोडा, वेंगुर्ले भागातून ये-जा करणारे नोकरदारही उपस्थित होते.