वार्ताहर/ मडकई
मुख्यमंत्र्यांनी 5 हजार नोकर भरतीची केलेली घोषणा म्हणजे जनतेच्या डोळय़ात निव्वळ धुळफेक करण्याचा प्रकार आहे. जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकांवर डोळा ठेऊन ही घोषणा असल्याची टिका मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. सरकारने अशा घोषणा करण्यापूर्वी कामगारांचे थकलेले वेतन आधी चुकते करावे, असा सल्ला ढवळीकर यांनी दिला आहे. बांदोडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेले काही महिने सरकारने कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया शाळा, महाविद्यालयात काम करणारे शिक्षक व कर्मचाऱयांचे वेतन दिलेले नाही. सरकारी अनुदानीत शाळांना अद्याप त्यांचे अनुदान मिळाले नाही. वनखात्यातील कंत्राटी कामगाराचीही हीच व्यथा आहे. सार्वजनीक बांधकाम खात्यातील 1150 कामगारांचा सहा महिन्यांचा पगार एकाचवेळी देण्याचे आश्वासन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिले होते. त्यांना एकाच महिन्याचा पगार मिळाला आहे. ‘लाडली लक्ष्मी’ योजनेखाली लाभधारक वधुंची लग्ने होऊन वर्ष उलटले तरी, त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. गृह आधार, निराधार या योजनांची हीच गत आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱयांचे वेतन व लाभधारकांचे पैसे आधी चुकते करावेत व नंतरच नवीन रोजगार भरतीची आश्वासने द्यावीत असे ढवळीकर यांनी सांगितले.
सध्या ग्रामपंचायती फोर्टिन फायनान्सवर चालत आहेत. त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. जनतेला रोजगार मिळायलाच हवा, पण फसवी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करु नये. कितीही आमदार पळविले तरी भाजपाची भूक भागत नसून आता स्थानिक पातळीवरील नगरसेवकांही पळविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. भाजपाची अधोगती सुरु झाली असून येणाऱया 2022 च्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असे ढवळीकर म्हणाले. पावसामुळे राज्यातील शेतकऱयांच्या पिकाची मोठी हानी झाली असून अशा शेतकऱयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी ढवळीकर यांनी केली.