दुष्टीच्या लाईफ गार्डचा ठाम निर्णय, निदर्शने सुरु
प्रतिनिधी/ पणजी
नोकरी नसल्यामुळे गेले 14 महिन्यापासून आमची परिस्थिती बिकट बनली आहे. आता करो या मरो या स्थितीवर पोचलो आहोत. जोपर्यंत सरकार नोकरीत घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा ठाम निर्णय लाईफगार्डने घेतला आहे. 27 पासून त्यांनी आझाद मैदानावर निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. गरज भासल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करून दरम्यान कोणताही अनर्थ घडल्यास त्याला पूर्णतः सरकार जबाबदार राहील, असा इशाराही लाईफगार्डने दिला आहे.
येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत लाईफगार्डच्यावतीने स्वाती केरकर पत्रकारांशी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हाणाल्या की सुमारे 250 लाईफगार्ड हे दृष्टी कंपनीत काम करीत होते अचानक या कामगारांना काढून टाकण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ते सरकार दरबारी हेलपाटे मारीत आहेत मात्र सरकारही त्यांच्याकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचे गोमंतकीयांचे की दृष्टी कंपनीचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दृष्टी कंपनीत काम करणारे हे लाईफगार्ड प्रशिक्षित असून त्यांना नोकरीत घ्यायलाच हवे, अशी मागणी केरकर यांनी केली आहे.
कोटय़वधी रुपयांचे दृष्टी कंपनीला दर पाचवर्षांने कंत्राट दिले जाते. दृष्टी कंपनी मात्र गोमंतकीयांचा लाईफगार्ड म्हणून वापर करून घेते काम करताना त्यांची पिळवणूक केली जाते. अपल्या हक्कासाठी कुणी आवाज उठविला तर त्याला नोकरीतून कमी केले जाते. हा कोणता न्याय. सरकार दृष्टी विरोधात कारवाई न करतात कामगारांना रस्त्यावर सोडून देत आहे. 14 महिन्यापूर्वी सरकार समोर अमची समस्या मांडली होती. सरकारने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते अद्याप कोणतीच हालचाल होत नसल्याने कामगारही कंटळलेले आहेत. काय करावे एका बाजूने उत्पन्नाचे साधन नाही तर दुसऱया बाजूने संसाराचा गाडा रेटायचा आहे. या साऱया विचाराने कामगार वैफल्यगस्त बनले आहेत. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे सरकारने वेळीच तोडगा काढावा अशी मागणी केरकर यांनी केली आहे. सरकारने एक तरी पर्यटन महामंडळाखाली या लाईफगार्डना कामावर घ्यावे किंवा लाईफगार्ड सोसायटी तयार करून लाईफगार्डची नोकरी त्यांना परत मिळवून द्यावी असेही केरकर म्हणाल्या.