केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली :
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. या काळात लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अंदाजानुसार, कोरोना संकटामुळे आतापर्यंत 1.9 कोटी लोकांनी नोकऱया गमवाव्या लागल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच 50 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. आता मोदी सरकार बेरोजगार औद्योगिक कामगारांना मोठा दिलासा देणार आहे. सरकारने अशा कामगारांना अर्धा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ईएसआयसी शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज तपासणीनंतर माहिती योग्य आढळल्यास त्यांना अर्धा पगार दिला जाईल. त्यानंतर रक्कम कामगाराच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच अटल विमा व्यक्ती कल्याण योजना 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार असल्याचे समजते.
कर्मचारी राज्य विमा निगमच्या कर्मचाऱयांना ही सुविधा दिली जाईल. यापूर्वी ही रक्कम 25 टक्के निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे वाढवून 50 टक्के करण्यात आली आहे. सूत्रांचा हवाला देत जवळपास 42 लाख लोकांना याचा फायदा होणार असल्याचा दावा ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने केला आहे.
लोकांच्या उपजीविकेवरचे संकट टाळण्यासाठी कामगार मंत्रालयाने अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत वाढविण्याच्या निर्णयाला अधिसूचित केले आहे. या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगममध्ये (ईएसआयसी) रजिस्टर्ड कामागारांना 50 टक्के बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. म्हणजेच कोरोना काळात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना 3 महिन्यांपर्यंत 50 टक्के वेतन बेरोजगारी भत्ता म्हणून मिळेल. 24 मार्च ते 31 डिसेंबरपर्यंत नोकऱया गमावलेल्या कामगारांना याचा फायदा मिळेल.