गोव्यात नोकरी करणारी मुले अडचणीत : गुणाजी गावडे यांनी वेधले लक्ष
वार्ताहर / सावंतवाडी:
गोव्यात काम करणाऱया आणि लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्गात अडकलेल्या युवक-युवतींसमोर आधीच पेड क्वारंटाईनच्या खर्चाची भीती असताना आता त्यांच्यासमोर घरभाडय़ाचा नवा पेच उभा राहिला आहे. गोव्यातील घरमालकांनी ‘तुम्ही कधीही या. मात्र आमचे दोन महिन्याचे भाडे द्या’, असा तगादा लावल्यामुळे मुलांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुलांनी शिवसेनेचे पदाधिकारी गुणाजी गावडे यांचे लक्ष वेधले. त्यांनी याबाबतची माहिती दिली असून पालकमंत्री आमदार दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
गोव्यात काम करणारी अनेक मुले लॉकडनच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हय़ात परतली होती. मात्र, आता पुन्हा कामावर जाण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, तेथे जाणाऱयांना पेड क्वारंटाईनची सक्ती केली जात आहे. त्या ठिकाणी राहत असलेल्या काही मुलांनी गावडेंकडे भाडय़ाचा विषय मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सिंधुदुर्गात अडकलेलो असताना त्या ठिकाणी असलेले घरमालक भाडय़ासाठी तगादा लावत आहेत. तुम्ही कोठेही असला तरी आम्हाला भाडे द्या. अन्यथा घर खाली करा, असे घरमालक सांगत आहेत.
आधीच दोन महिने काम नसल्याने पगार नाही. अशा परिस्थितीत भाडे द्यायचे कसे, असा प्रश्न मुलांनी केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी गावडे यांना दिली. ते म्हणाले, दोन महिने काम नसल्याने मुलांकडे पैसे नाहीत. अशा स्थितीत त्यांना सहकार्य होणे अपेक्षित आहे. त्यासाठी पालकमंत्री, आमदार आणि खासदारांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी आवश्यक ती चर्चा करून योग्य तो पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.