जनशिक्षण संस्थेतर्फे सियाचिन सैनिकांसाठी 5000 राख्या
प्रतिनिधी /पणजी
शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ नोकरी हा नसावा, किंबहुना नोकरीबरोबरच समाज व राष्ट्राप्रती आपली बांधिलकी आहे, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायला हवे व त्यादृष्टीकोनातून प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री बंदरे, नौवहन व जलमार्ग आणि पर्यटन राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी काल पर्वरी येथे केले.
जन शिक्षण संस्थान, गोवातर्फे पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी संकुलात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवडा सांगता सोहळय़ाचे प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. नाईक बोलत होते. स्वच्छता मोहिमेबरोबरच ‘एक राखी सैनिकांसाठी ‘ ही संकल्पना आयोजनाचा एक भाग होता. भारताच्या सियाचिन, लडाख व अतारी सिमांचे रक्षण करणाऱया सैनिकांना देण्यासाठी जनशिक्षण संस्थानच्या विविध केंद्रांच्या कलाकौशल्य शिक्षिकांनी तयार केलेल्या 5000 राख्या श्री. नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते या नात्याने विद्या प्रबोधिनी कॉलेजचे प्राचार्य श्री. भूषण भावे, प्रबोधिनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजय वालावलकर, सचिव श्री. राजेंद्र भोबे, श्री. राजकुमार देसाई, उत्तर गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष श्री. महानंद अस्नोडकर, जनशिक्षण संस्थानाचे चेअरमन श्री. दत्ता नाईक आणि जनशिक्षण संस्थानाचे संचालक श्री. श्रीहरी आठले आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व गोवा मुक्तीचा हिरक महोत्सवाचे औचित्य साधून जनशिक्षण संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना श्री. नाईक पुढे म्हणाले, ‘कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोग यांची सांगड घालून समाज व देशासाठी कार्य करणे आवश्यक आहे. देशाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे. भारत हा जगाचा गुरू म्हणून प्रस्थापित झालेले आहे, त्याचा प्रचार व प्रसार अधिक जोमाने व्हायला हवा‘.
जनशिक्षण संस्थानचे चेअरमन श्री. श्रीहरी आठले यांनी या प्रास्ताविक करताना संस्थानाच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. उपस्थित मान्यवरांनी जनशिक्षण संस्थानाच्या विविध केंद्रांतर्फे तयार करण्यात आलेल्या राख्यांच्या प्रदर्शनाची पाहणी केली. या समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दत्ता नाईक, विशेष पाहुणे श्री. राजकुमार देसाई, प्रमुख वक्ते श्री. भूषण भावे, श्री. संजय वालावलकर यांचीही समयोचित भाषणे झाली. निमिषा पळ यांनी कार्यक्रमाचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. निनाद वेळगेकर यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.