प्रतिनिधी/ पणजी
प्रत्येक निवडणुकीत हजारो नोकऱयांची आश्वासने देऊन बेकारांची चेष्टा आणि फसवणूक करणारे भाजप सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी पूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावी व नंतरच नव्या नोकऱयांचे आश्वासन द्यावे, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केली आहे. पुढील दोन महिन्यात ही आश्वासने पूर्ण न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांत 10 हजार नोकऱया देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हा खोटारडेपणाचा कळस आहे, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी 2012 मध्ये 50 हजार नोकऱयांचे आश्वासन, 2019 च्या पोटनिवडणुकीवेळी 3 वर्षांत 50 हजार नोकऱयांचे आश्वासन, गत वर्षी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत 10 हजार नोकऱयांचे आश्वासन, आणि आता पुन्हा तेवढय़ाच नोकऱया देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत. अशी किती म्हणून आश्वासने देणार असा सवाल करत हे सरकार बेकारांच्या भावनांशी खेळत आहे, त्यांना मूर्ख बनवत आहे, त्यांची चेष्टा करत आहे, असा आरोप राव यांनी केला.
सध्या या सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. विद्यमान कर्मचाऱयांनाच पगार देण्यासाठी निधी उपलब्ध नाही, कंत्राटदारांची कोटय़वधींची बिले तीन तीन वर्षांपासून थकली आहेत, अनेक सामाजिक व लोककल्याणकारी योजनांचे पैसे लोकांना मिळत नाहीत, अशावेळी नव्या कर्मचाऱयांची भरती केल्यास त्यांना पगार देण्यासाठी पैसा कुठून आणणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांना एक-दोनदा मूर्ख बनवता येते, सदैव नाही, असेही ते म्हणाले.
अर्थव्यवस्था ढासळली, बेराजगारी वाढली
कोरोना संकटकाळात केंद्रासह राज्य सरकारही सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाची जाणीव असूनही लसी उपलब्ध करण्यात हयगय केली. त्याही पुढे जाताना सुरक्षेच्या उपाययोजना न करता उलट मोठमोठय़ा मिरवणुका काढल्या, बंगालात निवडणूक घेतली, कुंभमेळा आयोजित करण्यास मान्यता दिली, त्यातून देशभरात कोरोना फैलावास मोठय़ा प्रमाणात वाव मिळाला, औषधे-ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे लाखो लोकांचे बळी गेले, अर्थव्यवस्था ढासळली, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. तरीही या अपयशाची जबाबदारी घेऊन साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य सुद्धा पंतप्रधानांनी आतापर्यंत दाखविलेले नाही, असे राव म्हणाले.
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यात एकवाक्यता नाही
भाजपला विकास नको. त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत, अन्य पक्षांची सत्ताधारी सरकारे कोसळावयाची आहेत, विरोधी आमदारांना फोडून स्वतःच्या पक्षात घ्यायचे आहेत, आणि त्याद्वारे एकाधिकारशाही गाजवायची आहे, अशी टीका राव यांनी केली. गोवा हे सर्वात सुशिक्षित, आर्थिकदृष्टया सक्षम असे राज्य. परंतु विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळे या राज्याला सर्वाधिक हानी पोहोचली आहे. अशा या चिमुकल्या राज्यात कोरोनामुळे तीन हजारांच्या आसपास लोक दगावले आहेत. जे राज्याच्या बाबतीत तोच गोंधळ सरकारी पातळीवरही. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यात एकवाक्यता नाही. त्यातून लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्यात आला. विनाकारण औषधांची खरेदी केली आणि पैशांची उधळपट्टी केली. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचे बळी गेले. ही स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री पूर्ण अपयशी ठरले. प्रशासनावर त्यांचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे, असे राव म्हणाले.
भाजपला बाजूला सारा
सध्या या सरकारात प्रचंड भ्रष्टाचार माजला असून प्रत्येकजण केवळ पैसा करण्यात व्यस्त आहेत. एखादा प्रकल्प गोव्याला आवश्यक आहे की नाही याचा अभ्याससुद्धा न करता तो लोकांच्या माथी मारला जात आहे. बडय़ा उद्योजकांचे लांगूलचालन करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे, असे आरोप राव यांनी केले. भाजपला लोकांचे आशीर्वादच नव्हते. त्यामुळे बेकायदेशीरपणे व मागील दारातून स्थापन झालेले असे हे सरकार आहे. म्हणूनच या सर्वांची किंमत येथील नागरिकांना मोजावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होताना येत्या निवडणुकीत भाजपला बाजूला सारावे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणास हानी पोहोचविणारे सर्व प्रकल्प रद्द करणार
येत्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यास राज्याच्या पर्यावरणास हानी पोहोचविणारे सर्व प्रकल्प रद्द करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. अशा प्रकल्पांची प्रकरणे न्यायालयात असली तरीही एक सरकार या नात्याने आम्ही न्यायालयात जाऊन त्यास विरोध करू शकतो, आमचे विचार, मत न्यायालयात मांडू शकतो, त्यावर विधानसभेत चर्चा करू शकतो. गोव्याला कोळसा हब बनवायचे की नाही? रेल्वे दुपदरीकरण हवे की नको? वीज प्रकल्प, म्हादई, या सर्व प्रकरणांचे निर्णय गोमंतकीयांनी घ्यावयाचे आहेत, असे ते म्हणाले.
सध्यातरी निवडणुकपूर्व युतीचा विचार नाही
निवडणुकपूर्व युती करण्यात येईल का? असे विचारता, सध्यातरी तसा कोणताही विचार नाही. युती होईल की नाही हे सुद्धा निश्चित झालेले नाही. आपण आधी प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करून लोकमताचा अंदाज घेणार आहे. त्यानंतरच योग्य वेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
‘त्या’ आमदारांना काँग्रेसची दारे कायमस्वरुपी बंद
गैरमार्गाने करण्यात आलेली राजकीय फूट कुणीच रोखू शकत नाही. जे आमदार काँग्रेस सोडून गेले ते घातकी होते. भाजपात जाऊन मंत्री बनले असले तरीही आजही ते काँग्रेसचेच आमदार आहेत. अशा आमदारांना आता मतदारांनीच धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. यापुढे मात्र आम्ही अशी चूक करणार नाही. प्रत्येक उमेदवाराची पात्रता, पक्षनिष्ठा, समाजकार्य, पक्षकार्य, विश्वासार्हता तसेच जिंकण्याची क्षमता, या सर्व बाबी तपासूनच उमेदवारी दिली जाईल, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, ऍड. रमाकांत खलप, प्रकाश राठोड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.