सिंधुदुर्गातील युवक-युवतांसमोर गोव्यातील कडक नियमावलीची भिंत : गोव्यातील कंपन्या हळुहळू पूर्वपदावर : दोन्ही सरकारांनी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी
तेजस देसाई / दोडामार्ग:
संपूर्ण राज्य कोरोनामुक्त झाल्याने गोव्याची पावले ‘ग्रीन झोन’कडे पडली आहेत. देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख असलेल्या गोव्याने कोरोनाच्या दणक्यानंतर अधिक खबरदारी घेतली आहे. ग्रीन झोनमध्ये वळलेल्या गोव्यात कंपन्या, उद्योगधंदे, आस्थापने हळुहळू सुरू झाली आहेत. त्यातून गोव्यातील जनजीवन व आर्थिक गाडी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. गोव्याच्यादृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. मात्र, गोवा प्रशासनाने सुधारित नियम व अटी यांची उभी केलेली भिंत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील अनेक युवक-युवतींना अडचणीची ठरते आहे. गोव्यातील ज्या कंपन्या आस्थापनांमध्ये तालुक्यांतील युवक-युवती कामानिमित्त होत्या, त्या सर्वांसमोर या नव्या अटी, नियमांचे वेगळे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते व संस्था या सर्वांनी या मुद्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक बनले आहे.
22 मार्चच्या ‘जनता कर्फ्यू’ नंतर देशभरात लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. देशातील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे, शहरे यांच्यासोबत गोव्यातही लॉकडाऊन कार्यवाही प्रभावीपणे सुरू झाली. परदेशातील पर्यटकांच्या पर्यटनाचे विशेष केंद्र असलेल्या गोव्याने विमान उड्डाणे तातडीने बंद केली. तसेच आपल्याकडील अनेक कंपन्या, उद्योगधंदे यांची ताळेबंदी घोषित केली. तरीही गोव्यात विदेशातून आलेल्यांमधून कोरोनाचे रुग्ण निघालेच. त्यामुळे गोव्याने कोरोनाविषयी गांभीर्याने राहून तेवढीच कडक पावले उचलली. त्याचाच परिणाम म्हणून लवकरात लवकर कोरोनामुक्त होणारे गोवा हे पहिले राज्य ठरले. ग्रीनझोनमध्ये पाऊल ठेवलेल्या गोव्याने कोरोना मुक्तीनंतर आपल्या राज्याच्या चारही सीमा लॉक करण्यासोबत अन्य बरीच कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याची मंदावलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनेक कंपन्या, उद्योगधंदे हळुहळू सुरू करण्यात गोवा प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, हे करताना अनेक कडक नियम व अटी यांचे पालन झाल्यानंतरच कामाधंद्यानिमित्त गोव्यात येऊ इच्छीणाऱयांला प्रवेश दिला जाणार आहे. याचाच फटका दोडामार्ग तालुक्यातील अनेक युवक-युवतींना बसला आहे.
पाचशेहून अधिक युवक-युवतींवर : कोसळणार बेकारीची कुऱहाड
दोडामार्ग शहरासह तालुक्यातील आयी, तिलारी व कळणे या तिन्ही पंचक्रोशीतून दर दिवशी असंख्य युवक-युवती नोकरीसाठी ये जा करत होते. मार्केटिंग क्षेत्रात या युवक-युवतींची नेमणुका झाल्या होत्या. गोव्यातून तेथील परिवहन मंडळाच्या कदंबा तसेच खासगी बसच्या फेऱया दोडामार्ग तालुक्यातील ब्रयाच गावांपर्यंत असल्याने या बसेसेच्या माध्यमातून हे युवक-युवती गोव्यात दररोज ये-जा करत असतात. त्यांच्या निवासाच्या सोयी गोव्यात नव्हत्या. शिवाय अनिश्चित शिफ्टमुळे कधीही ये-जा करावी लागत असे. ते युवक आपल्या दुचाकीवरून नोकरीच्या ठिकाणी ये-जा करत असत. गेल्या महिन्या, दीड महिन्यांमध्ये ही सर्व मंडळी लॉकडाऊनमुळे आपआपल्या घरी राहिली होती. गेल्या आठवडय़ात संपूर्ण कोरोनामुक्त झालेल्या गोव्याने ग्रीनझोनेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर बंदावस्थेत असलेल्या कंपन्या, उद्योगधंदे सुरू झाले आहे. सहाजिकच आपण आता आपल्या नेहमीच्या ठिकाणी कामावर जाऊ, या कल्पनेनेच तालुक्यातील अनेक युवक-युवती आनंदात होत्या. परंतु कोरोनाची झळ सोसलेल्या गोव्याने परराज्यातून येणाऱयांसाठी अत्यंत कडक स्वरुपाची नियमावली केली असून याचा फटका मात्र येथील या युवक-युवतींना बसला आहे. पेड क्वारंटाईन तसेच तत्सम कार्यवाही स्वखर्चातून करून नंतर ती संबंधित प्रशासनाने मान्य केलीच तर गोव्यात प्रवेश. असेच काहीसे स्वरुप असलेल्या या नियमांची पूर्तता करताना दोडामार्ग तालुक्यातील या युवक-युवतींची दमछाक होत आहे.
राजकीय पातळीवर प्रयत्न आवश्यक
दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सद्यस्थितीत कोणतेही मोठे उद्योगधंदे, कंपन्या नसल्यामुळे असंख्य युवक-युवती गोव्यातील कंपन्या, आस्थापने याठिकाणी नोकरीनिमित्त आहेत. कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असलेल्या युवक-युवतींच्यासमोर गोव्यातील कंपन्यांमधील नोकरीचा एकमेव आधार आहे. त्यामुळे पेड क्वारंटाईन तसेच कार्यवाही सारख्या ठिकाणी पैसे मोजणे हे त्यांना शक्य नाही. ते लक्षात घेऊन या युवक-युवतींसाठी पेड क्वारंटाईन व अन्य बाबींची रक्कम रद्द अथवा शिथिल करण्यासंबंधी गोवा व महाराष्ट्र या दोन्ही सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे गरजेचे आहे. त्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व संस्था या सर्वांनी यात लक्ष घालावे, आवश्यक बनले आहे.
महाराष्ट्र व गोव्याने तातडीने लक्ष द्यावे- विष्णू ठाकुर
गोव्यातील कंपन्या उद्योगधंदे या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यातील दिवसाकाठी जवळजवळ पाचशेच्या आसपास युवक-युवतींची ये- जा सुरू असते. मी गोव्यात गेली अनेक वर्षे नोकरीनिमित्त आहे. या नोकरीवरच माझ्या व इतरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. गोव्यात कंपन्या सुरू झाल्या असून आम्हाला आमच्या कामावर जायचे आहे. मात्र, गोवा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने जी नियमावली केली आहे, त्यामध्ये शिथिलता येण्याची महाराष्ट्र व गोवा सरकारने किंबहुना दोन्हीकडील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी कोनाळकट्टा येथील विष्णू ठाकुर यांनी बोलताना व्यक्त केली.