मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कुंकळ्ळीत घोषणा : कसूर राहिल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरू,दिगंबर कामत यांनी आपल्याला विकास शिकवू नये
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
नोव्हेंबरपर्यंत राज्यातील एकाही रस्त्यावर खड्डे राहणार नसून याची पूर्ण खबरदारी सरकारने घेतली आहे. तसा सक्त आदेश यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. तरीही कुठेही कसूर राहिल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी कुंकळ्ळीत बोलताना स्पष्ट केले. कुंकळ्ळीत प्रशासन तुमच्या दारात या उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
पाऊस मोठय़ा प्रमाणात पडल्याने रस्त्यांवर खड्डे तयार झाले. दिगंबर कामत यांचे सरकार सत्तेवर होते तेव्हाही रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले होते. त्यावेळी सरकारची तिजोरी भरलेली होती. तरीही रस्ते त्यांना ठीक करता आले नाहीत वा नीट विकास करता आला नाही. पण आज आपण सकाळी येताना पाहिले की, आडवे तिडवे होऊन दिगंबर कामत रस्त्याची छायाचित्रे काढत आहेत. त्यांनी विकास म्हणजे काय ते आपल्याला शिकविण्याची गरज नाही, अशी टीका सावंत यांनी केली.
यांच्या पक्षाकडे नेतृत्व नाही. केंद्रातही नेतृत्व नाही. या पक्षाला मोठे करणारे लुईझिन फालेरो अन्य पक्षात गेले आहेत. दुसरे नेते वाटेवर आहेत, तर तिसरे हालचाली करत आहेत, असा टोला त्यांनी हाणला.
…म्हणून मोफत पाणी देणे झाले शक्य
आपणास नोकऱयांसबंधी विचारले जाते. सरकार नोव्हेंबरपर्यंत रोजगाराचा प्रश्न सोडवेल. त्यात पारदर्शकता असेल, असे ते म्हणाले. विकासकामांना व आरोग्यासंदर्भात विरोध होत आहे. हे थांबले पाहिजे. विरोधकांनी निवडणुकीत जरूर राजकारण करावे. सोळा हजार लिटर मोफत पाणी देण्याची घोषणा केली तेव्हा आपण निवडणुकीवर डोळा ठेवून ही घोषणा करत असल्याची टीका ज्यांनी केली त्यांना सरकारातून काढून टाकल्याने मोफत पाणी देणे शक्मय झाले आहे.
कुंकळीत विकासकामे मार्गे लागली
कुंकळ्ळीत विकासकामे अडवली जात होती. पण आज कुंकळ्ळीत स्थानिक आमदार क्लाफासियो डायस यांची कामे पूर्ण झाली आहेत. सरकारात जे स्वार्थी घटक होते त्यांना काढून टाकले. त्यांना सरकार करत असलेली विकासकामे पाहवत नाहीत, अशी टीका सावंत यांनी पुढे बोलताना केली.
कुंकळ्ळीसह संपूर्ण सासष्टीचा विकास
सासष्टीत जरी भाजपाचे जास्त मतदार नसले, तरी विकासाच्या बाबतीत सासष्टी इंचभरही मागे राहणार नाही. कोणताच भेदभाव न करता कुंकळ्ळीबरोबर संपूर्ण सासष्टीचा विकास साधला जाणार, अशी ग्वाही सावंत यांनी दिली. येणाऱया तीन महिन्यांत सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्ती होणार आहे. जी वचने आपल्या सरकारने जनतेला दिली होती ती सर्व वचने पूर्ण करूनच आपले सरकार निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असे ते म्हणाले.
विरोधकांच्या टीकेला विकासकामांनी उत्तर
विरोधक फक्त सरकारवर टीका करण्यात धन्यता मानतात. मात्र आपले सरकार टीकेला कामाने उत्तर देत आहे. सरकार तुमच्या दारात हा उपक्रम राज्यातील सर्वसामान्यांना फायदा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात येत असून जे लोक त्यात सहभागी होतात त्यांची साठ टक्के कामे तत्काळ होणार. या उपक्रमातून एक देखील नागरिक हिरमुसला होऊन घरी जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे, असे सावंत यांनी सांगितले.
कुंकळळी शिक्षण संस्थेच्या पटांगणावर आयोजित केलेल्या या उपक्रमाच्या उद्घाटनाला जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, आमदार क्लाफासियो डायस, माजी आमदार राजन नाईक व जिल्हाधिकारी रूचिका कटियाल या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
विद्यमान सरकार लोकहितार्थ काम करत असून आपण विकासशील सरकारला पाठिंबा दिला याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे रॉड्रिग्स म्हणाले. तर आमदार डायस यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आपली नव्वद टक्के विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले. कुंकळ्ळी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विदेश देसाई यांनी स्वागत, तर विजयकुमार कोप्रे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश जोतकर यांनी आभार मानले.