सांख्यिकी मंत्रालयाचा अहवालात माहिती : नजीकच्या भविष्यकाळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत
नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून आर्थिक मंदी आणि बेरोजगारी मागणीत घट यासारख्या घटनांच्या अनेक बातम्या ऐकण्यास मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह सरकार चिंतेत राहिल्याचे दिसून आले होते. परंतु सध्या सरकारसह अन्य क्षेत्रांना दिलासा देणारी बातमी आली आहे. ती म्हणजे नोव्हेंबरमध्ये जवळपास 23 लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती सरकारच्या सांख्यिकी विभागांच्या माहितीमधून समोर आली आहे. यातून आर्थिक मंदीची तीव्रता कमी होत असल्याचे संकेत काही प्रमाणात मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात फॉर्मल क्षेत्रात जवळपास 23 लाख 47 हजार 649 इतक्या जणांना रोजगार मिळाला आहे. ही माहिती सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाकडे तीन सामाजिक योजनांच्या नवीन नोंदणीमधून मिळते. यामध्ये अनुक्रमे उपलब्ध असणाऱया माहितीत एम्प्लॉयी प्रॉव्हीडेंट फंड (इपीएफ) यांच्याकडे 8,67,963 लोकांची नोंद झाली आहे, 14 लाख 33 हजार जण स्टेट इन्शुरन्स स्कीम (इएसआय) आणि 46,686 जणांची नॅशनल पेंशन स्कीममधून मिळत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
एप्रिल 2018 पासूनची माहिती
सरकार सामान्य क्षेत्रातील किती जणांना रोजगार प्राप्ती झाली आहे. त्यांची माहिती एप्रिल 2018 नंतर प्रत्येक महिन्याला एका अहवालामधून सरकारकडून सादर केली जाते. यामध्ये किती युवकांना रोजगार मिळाला त्याची नोंदणी एनपीआर, इएसआय आणि एनपीएसच्या आधारे करण्यात येते. ही माहिती विश्वासार्ह मानली जाते.
काय आहे नियम?
कोणत्याही संस्थेत 20 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत असल्यास त्यांना इपीएफ देणे बंधनकारक असते. 10 पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास त्या सर्व कर्मचाऱयांची इएसआय सुविधा देणे आवश्यक असते. तर नॅशनल पेन्शन स्कीममध्ये कोणत्याही भारतीयांचा समावेश करण्यात येतो, परंतु त्यांचे वय 18 ते 60 वर्ष असणे आवशयक आहे.