नियमावलीच्या अंमलबजावणीमध्ये भेदभाव का? : बाजारपेठेत पार्किंगची समस्या जैसे थे
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पार्किंगची समस्या भेडसावत असून नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क करण्यात येणाऱया दुचाकी उचलून नेण्याची कारवाई करण्यात येत आहे. पण कॉलेज रोडवर नो पार्किग फलकाशेजारीच चारचाकी वाहने पार्क करूनही रहदारी खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे नियमावलीच्या अंमलबजावणीमध्ये भेदभाव का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
सध्या शहरात लोकसंख्येप्रमाणे दुचाकी-चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत पार्किंगच्या समस्या भेडसावत असून पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. मात्र याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडून वाहन कर भरून घेतला जातो. पण त्यांच्या वाहनांसाठी बाजारपेठेत पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. तसेच बाजारपेठेत येणाऱया परराज्य आणि परगावच्या वाहनधारकांना वाहने पार्क करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागतो. वाहनांची सख्या वाढली असल्याने बाजारपेठेतील पार्किंग तळ अपुरे पडत आहेत. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहेत. सध्या बाजारपेठेत रस्त्याशेजारी दुचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी जागा शिल्लक रहात नाही. बाजारपेठेत वाहन तळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापलिका प्रशासनाची आहे. पण पार्किंग तळ उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. मात्र फटका शहरवासियांना आणि वाहनधारकांना बसत आहे.
बाजारपेठेत रस्त्याशेजारी पार्क करण्यात येणारी दुचाकी वाहने रहदारी पोलीस खात्याकडून उचलून नेण्यात येत आहेत. तसेच दुचाकी वाहन सोडण्यासाठी सोळाशे रुपये दंड आकारला जात आहे. शहरात पार्किंगची सुविधा नाही, एकीकडे पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे भरमसाट दंडाची रक्कम आकारण्यात येत आहे. तसेच हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारला जात आहे. त्यामुळे दुचाकीधारकांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
चारचाकी वाहनांकडे दुर्लक्ष
नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क करणाऱया दुचाकी वाहनधारकांना लक्ष्य केले जात असून चारचाकी वाहनांकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची टीका दुचाकी वाहनधारक करीत आहेत. तसेच काही चौक आणि रस्त्यावर तसेच बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वास्तविक, रहदारी नियत्रंणासाठी बाजारपेठेत पोलिसांची नियुक्ती करण्यात येत होती. पण अलिकडे काही मोजक्मयाच ठिकाणी रहदारी पोलीस नियुक्त करण्यात येत असून सर्व रहदारी पोलीस विनाहेल्मेट कारवाईत गुंतलेले असतात. त्यामुळे दंड वसुलीसाठी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.