सागरी सुरक्षेचा घेतला जाणार आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाच्या वरिष्ठ कमांडरांची 3 दिवसीय परिषद बुधवारपासून सुरू झाली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी सागरी सुरक्षेच्या आढाव्यासह पूर्व लडाखमधील सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावावरही चर्चा झाल्याचे समजते. परिषदेच्या अनावरण सत्रात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सामील झाले.
परिषदेत नौदलाच्या युद्धसज्जतेसह भारत-प्रशांत क्षेत्रातील हितसंबंधांच्या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या क्षेत्रात चीन वेगाने स्वतःचे अस्तित्व वाढवू पाहत आहे. हिंदी महासागरात चीनच्या आव्हानावरही परिषदेत चर्चा होणार आहे. नौदलाने हिंदी महासागरात युद्धनौका आणि पाणबुडय़ा तैनात करत चीनला स्पष्ट संदेश दिला आहे.
उत्तर सीमेवर अलिकडेच घडलेल्या घटना आणि कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परिषदेचे अत्यंत मोठे महत्त्व असल्याचे भारतीय नौदलाने मंगळवारी म्हटले होते.