राष्ट्रपती कोविंद यांचे प्रतिपादन – संगमनगरी प्रयागराजच्या दौऱयावर
वृत्तसंस्था/ प्रयागराज
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संगमनगरी प्रयागराजमध्ये 640 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शिलान्यास केला आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता चेंबरची इमारत तसेच मल्टी लेव्हर पार्किंग प्रकल्पाच्या कार्याचा त्यांनी शुभारंभ केला आहे. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी न्यायपालिकेत महिलांची हिस्सेदारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे.
1925 मध्ये भारतातील पहिल्या महिला वकिलाची नोंदणी अलाहाबाद उच्च न्यायालयातच झाली होती असा उल्लेख त्यांनी यावेळी केला आहे. राष्ट्रपतींनी अलिकडेच नियुक्ती तीन महिला न्यायाधीशांबद्दलही विधान केले आहे. महिलांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांना न्याय मिळवून देण्याची क्षमता असते. न्यायपालिकेत महिलांची भूमिका वाढल्यावरच खऱया अर्थाने न्यायपूर्ण समाजाची स्थापना शक्य होणार आहे. महिलांची न्यायपालिकेतील हिस्सेदारी सध्या 12 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. देशाच्या या मोठय़ा उच्च न्यायालयात महिला वकिलांच्या संख्येत वाढ होईल अशी आशा करत असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.
सर्वांना न्याय मिळावा
सर्वांना न्याय मिळावा याकरता काम करावे लागेल. सर्वसामान्य लोकांमध्ये न्यायपालिकेबद्दल विश्वास निर्माण करावा लागणार आहे. प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढले जावेत. न्यायाधीशांची संख्या वाढवून आणि अन्य साधनसामग्री उपलब्ध केल्यानेच न्यायप्रक्रियेला बळ मिळणार आहे. जगभरातील लोकांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण केले असते तर 9/11 सारख्या घटना घडल्याच नसत्या असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.