सरन्यायाधीश बोबडे यांनी केले स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या न्यायव्यवस्थेने महिलांना नेहमीच सर्वोच्च आदराचे स्थान दिले आहे, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश बोबडे यांनी त्यांच्यासंबंधातील वादग्रस्ततेला पूर्णविराम दिला आहे. एका बलात्कारपिडीत अल्पवयीन मुलीच्या संदर्भात, बलात्कार आरोपी तिच्याशी लग्न करणार आहे का, असा प्रश्न सरन्यायाधीश बोबडे यांनी या प्रकरणाची हाताळणी सुरू असताना विचारला होता, असे बोलले जात होते. त्यासंबंधी त्यांनी महिला दिनाचे निमित्त साधून स्पष्टीकरण दिले.
आपले ते विधान विपर्यस्त पद्धतीने प्रसारित केले गेले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनांमध्ये गैरसमज पसरला. तथापि, ज्या प्रकारे हे विधान आपण केल्याचे सांगितले गेले तसा प्रकार नव्हता. बलात्काऱयाने त्या पिडीतेशी विवाह करावा अशी सूचना मी केली नव्हती. तू तिच्याशी लग्न करणार आहेस का ? असा तो प्रश्न होता आणि तो केवळ माहितीसाठी विचारला होता. कारण तशी कागदपत्रे न्यायालयासमोर होती. त्या आधारावर तो प्रश्न विचारला होता. याचा अर्थ आरोपीने आणि पिडितेने विवाह करावा अशी सूचना मी केली, असा होत नाही. तसा अर्थ विपर्यस्त पद्धतीने लावण्यात आला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
घटना नेमकी काय
मोहीत सुभाष चव्हाण नामक एका युवकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पिडितेने पोलिसात तक्रार केली तेव्हा आरोपीच्या आईने आरोपी पिडीतेशी विवाह करण्यास तयार आहे, असे लिहून दिले. हा विवाह पिडीता सज्ञान झाल्यानंतर होणार होता. तथापि, पिडीता सज्ञान झाल्यानंतर तिने आरोपीशी विवाह करण्यास नकार दिला व त्यानंतर बलात्काराची तक्रार सादर करण्यात आली. न्यायालयात ही सर्व कागदपत्रेही सादर करण्यात आली. त्याच कागदांच्या आधारे सरन्यायाधीशांनी तोंडी तो प्रश्न विचारला होता.