नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सुचविलेल्या पाच न्यायाधीशांची नियुक्ती येत्या पाच दिवसांमध्ये केली जाईल, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले आहे. न्यायवृंदाने 13 डिसेंबर या दिवशी ही नावे सरकारला सुचविली होती. मात्र, सरकारने निर्णय घेतला नव्हता.
राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंकज मिथल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अहसानुद्दिन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनोज मिश्रा या पाच न्यायाधीशांची नावे न्यायवृंदाने केंद्र सरकारला दिलेली होती. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या सरन्यायाधीशांसह 34 आहे. मात्र सध्या ती 27 आहे.
कठोर व्हायला लावू नका
केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला कठोर निर्णय द्यावा लागेल. त्रास होईल असा निर्णय घेण्यास आम्हाला भाग पाडू नका, अशी टिप्पणी न्या. संजय किशन कौल आणि न्या. अभय ओक यांनी सुनावणीच्या वेळी केली. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करुन नियुक्ती 5 दिवसांमध्ये करत असल्याचे स्पष्ट केले. पुढील सुनावणी 13 फेब्रुवारीला आहे.