न्या. जी. जी. शिरोळ यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
कायद्याचे राज्य यायचे असेल तर कायद्याचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. न्यायापासुन कोणतीही व्यक्ती वंचित राहू नये. गरीबी आणि कायद्याचे अन्यान यामुळे अनेक लोक अन्याय सहन करत जगतात. गोरगरीब, स्त्रीया, निराधार आणि दिव्यांग व्यक्तींना कायद्याची मोफत मदत दिली जाते. एक पैसाही खर्च येत नाही. विद्यार्थ्यांनी हे ज्ञान खेडो पाडय़ापर्यंत पोहोचवावे असे विचार न्या. जी. जी. शिरोळ यांनी मांडले.
बेळगाव जिल्हा कायदा प्राधिकार, राणी चन्नम्मा विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व मराठा मंडळ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदा साक्षरता अभियानामध्ये न्यायमूर्ती बोलत होते. व्यासपिठावर प्रा. जी. वाय. बेन्नाळकर, गणपती भट, कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकाराचे सदस्य व राणी चन्नम्मा विद्यापिठाचे डीन प्रा. विनोद गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. बी. एस. नावी उपस्थित होते.
न्यायमूर्ती गणपती भट म्हणाले सरकार व कायद्याने अनेक गोष्टी सर्वसामान्यांसाठी केल्या आहेत. त्याची माहिती करून घ्या. आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, बीपीएलकार्ड, ज्ये÷ नागरिक म्हणून नोंदणी, वाहन परवाना, मजूर ओळखपत्र यासह इतर कागदपत्रांची माहिती करून घ्या असे त्यांनी सांगितले.
प्रा. विनोद गायकवाड आणि प्रा. डॉ. बी. एस. नावी यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत प्रा. आंची यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी केले. तर प्रा. अर्चना भोसले यांनी आभार मानले.